नवी दिल्ली, 26 जानेवारी : क्लायमेट चेंज (Climate Change) अर्थात हवामानबदलाची समस्या खरी आहे, हळूहळू भीषण होते आहे. तरीही अनेक जणांना हे स्वीकारायचं नसतं, की आपल्या सुखासीन जीवनशैलीमुळे पृथ्वीच्या वातावरणावर दुष्परिणाम होतात. हवामानबदलाबद्दल लोकांना जागरूक करणं हे केवळ शास्त्रज्ञांचंच काम नाही. तरुण पिढीनेही त्यात सहभागी व्हायला हवं. कारण तेच या पृथ्वीवरचे पुढचे रहिवासी आहेत. अशाच आश्वासक तरुणांपैकी एक नाव म्हणजे भारतातली लिसिप्रिया कांगुजाम. (Licipriya Kangujam)
जगातल्या सर्वांत तरुण पर्यावरणविषयक कार्यकर्त्यांपैकी एक म्हणजे लिसिप्रिया. ग्रेटा थंबर्ग (Greta Thumberg) या तरुण पर्यावरण कार्यकर्तीकडे जगभरातल्या नेत्यांचं, नागरिकांचं लक्ष गेलं; लिसिप्रियाकडे मात्र भारतातल्याही नागरिकांकडून दुर्लक्ष झालं आहे. 2019मध्ये स्पेनमध्ये माद्रिदला (Madrid) झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरणविषयक परिषदेत (COP25) भाषणासाठी तिची निवड झाली, तेव्हा आंतरराष्ट्रीय माध्यमांनी तिची दखल घेतली. त्या वेळी ती केवळ आठ वर्षांची होती. तिच्या ऐतिहासिक भाषणातून तिने सगळ्या जगाला आपली पृथ्वी वाचवण्याची साद घातली. पर्यावरणविषयक जागरूकता वाढवण्यासाठी ती दोन वर्षं मोहिमा चालवते आहे. तसंच, शाळांमध्ये क्लायमेट चेंजविषयीचा अभ्यासक्रमही असणं बंधनकारक करण्याची मागणीही तिने लावून धरली आहे. माद्रिदमधल्या भाषणात तिने सांगितलं, की हीच काम करण्याची अत्यंत महत्त्वाची वेळ आहे.
हे ही वाचा-डिजिटल मतदार ओळखपत्र कसं मिळवाल? वाचा तुमच्या मनातील 19 प्रश्नांची उत्तरे
कार्बन मार्केट्सच्या (Carbon Markets) संदर्भात विविध तज्ज्ञांनी तिथे आपली मतं मांडली. 'माझ्या जन्माच्या आधीपासूनच ही समस्या जागतिक नेत्यांना माहिती होती, तर शाळेत जाण्याच्या, खेळण्याच्या वयात मला इथे येण्याची गरज का भासली,' असा प्रश्न तिने उपस्थित केला. उत्सर्जन तातडीने कमी करण्याची गरज, अधिक शाश्वत यंत्रणा उभारण्याची आणि पृथ्वीवरची विविधता टिकवण्याची गरज याबद्दल तिने भाषणातून विचार मांडले. त्या कार्यक्रमात लिसिप्रिया ग्रेटालाही भेटली. त्या कार्यक्रमात सहभागी असलेली नेतेमंडळी पर्यावरणाविषयी फारशी काळजी करत नसल्याचं पाहून त्या दोघीही निराश झाल्या होत्या; मात्र ग्रेटाचा खूप मोठा प्रभाव आपल्यावर असल्याचं लिसिप्रिया सांगते.
वयाच्या सहाव्या वर्षापासून लिसिप्रिया पर्यावरणासाठी लढू लागली. 'द हिंदू'ला दिलेल्या मुलाखतीत तिने सांगितलं, की नैसर्गिक आपत्तीची जोखीम कमी करण्यासंदर्भातल्या एका बैठकीला ती उपस्थित होती. त्या बैठकीचा तिच्यावर खूप प्रभाव पडला. आपण वसुंधरेवर कसे अत्याचार करत आहोत, ते त्यातून कळलं. नैसर्गिक आपत्तीमुळे बेघर झालेल्यांना ती भेटली. त्यानंतर ती जगभर फिरली, अन्य कार्यकर्त्यांना भेटली आणि विविध चळवळींमध्ये सहभागी झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अन्य खासदारांचं लक्ष वेधून घेण्यासाठी ती संसदेबाहेरही काही आठवडे हातात फलक घेऊन बसली. कार्बन उत्सर्जन (Carbon Emission) कमी करण्यासाठी, त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक तो कायदा ते मंजूर करतील, अशी आशा ती बाळगून होती.
... पण तिचा आवाज दिल्लीतही ऐकला गेला नाही आणि परिषदेतूनही फार काही निष्पन्न झालं असं नाही, असं तिला वाटतं. तिच्या मतानुसार, सरकारं फक्त स्टॉक्स आणि मतांमध्येच रस दाखवतात; पण वसुंधरेला गमावणं म्हणजे शेअर बाजारात काही डॉलर्स गमावणं नव्हे किंवा निवडणुकीत काही मतं गमावणं नव्हे. ते अख्ख्या मानवजातीचं, पशु-पक्ष्यांचं, झाडामाडांचं, समुद्रांचं आणि आपलं जीवन समृद्ध करणाऱ्या प्रत्येक गोष्टीचं भविष्य वेठीस धरण्यासारखं आहे. लिसिप्रियाला अवकाश संशोधक व्हायचं आहे. माद्रिदमधल्या भाषणासाठी तिला सरकारकडून काहीही मदत मिळाली नाही. सरकारकडे विनंती करूनही तिचा तिलाच निधी उभा करावा लागला, हे दुर्दैव.
हार्पिक-न्यूज18च्या मिशन पानी या मोहिमेत सहभागी व्हा, पाणी वाचवण्याची शपथ घ्या आणि वॉटरथॉनचे सगळे अपडेट्स इथे मिळवा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Environment