नवी दिल्ली, 29 जुलै: लोकांना आमिष दाखवून इस्लाम धर्म (Islam) स्वीकारायला लावणाऱ्या काही लोकांना उत्तर प्रदेश एटीएस (Uttar Pradesh ATS) अर्थात दहशतवाद विरोधी पथकानं काही दिवसांपूर्वी अटक केली. धर्मांतरासाठी (Conversion) फूस लावणाऱ्या या लोकांकडून पोलिसांना ज्या लोकांनी धर्मांतर केलं त्यांची नावं समजली होती. या धर्मांतर केलेल्या लोकांच्या यादीत मेरठचे (Meerut) एक रहिवासी प्रवीण कुमार (Pravin Kumar) यांचे नाव देखील आले होते. मात्र त्यांचं नाव चुकीने त्या यादीत आल्याचा दावा प्रवीण कुमार यांनी केला असून, उत्तर प्रदेश एटीएसनंही त्यांना क्लीन चीट दिली आहे. तरीही प्रवीण कुमार यांना समाजातून वाईट वागणूक मिळत असून, बहिष्कारासह इतर अनेक परिणामांना सामोरं जावं लागत आहे. आपली मूळ ओळख आणि सन्मान परत मिळवण्यासाठी प्रवीण कुमार यांनी सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) याचिका (Petition) दाखल करण्याचा निर्णय घेतला. आपल्यावर काय स्थिती ओढवली आहे याची देशाला माहिती व्हावी याकरता त्यांनी दिल्ली स्थित सर्वोच्च न्यायालयात पायी जाण्याचा मार्ग (Walking) अवलंबला आहे.
मेरठपासून 200 किलोमीटर अंतरावर असलेल्या दिल्लीला ते पायी निघाले असून, अकरा दिवसात हा प्रवास पूर्ण होईल, अशी त्यांची अपेक्षा आहे. दरम्यान या प्रवासात त्यांना मुसळधार पावसासह अनेक संकटांचा सामना करावा लागत असल्याचं टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तात म्हटलं आहे.
शीतला खेडा गावात राहणारे प्रवीण कुमार पीएचडी स्कॉलर असून, एका साखर कारखान्यात (Sugar Factory) अधिकारी आहेत. गेल्या महिन्यात उत्तर प्रदेश एटीएसनं त्यांना धर्मांतर प्रकरणात चौकशीसाठी नेले. तेव्हापासून त्यांना गावात तिरस्काराची वागणूक दिली जात आहे. प्रवीण कुमार स्वतःला हिंदू राष्ट्रवादी म्हणवतात. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर एक पुस्तकही लिहिले आहे.
एटीएसच्या हाती लागलेल्या इस्लाम धर्म स्वीकारलेल्या लोकांची यादीत आणि प्रमाणपत्रावर अब्दुल समद हे नाव होतं. त्या प्रमाणपत्रावर प्रवीण यांचा फोटो होता. त्यामुळं अब्दुल समदच्या शोधात एटीएस प्रवीण कुमार यांच्यापर्यंत पोहोचली. त्यांनी 23 जून रोजी प्रवीण कुमार यांच्या घरावर छापा घातला. मात्र त्यांना प्रवीण कुमार यांच्या विरुद्ध काहीही पुरावा मिळाला नाही. त्यामुळे एटीएसनं त्यांना क्लीन चीट दिली. मात्र या सगळ्या प्रकारामुळे लोकांचा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला आणि गावानं जणू त्यांच्यावर बहिष्कार टाकला.
महिलांसाठी 24 तास काम करणार ही राष्ट्रीय हेल्पलाईन, या क्रमांकावर नोंदवता येणार तक्रार
प्रवीण कुमार सांगतात एक दिवस त्यांना त्यांच्या घराच्या भिंतीवर ‘दहशतवादी’, ‘पाकिस्तानात जा’ असं लिहिल्याचं आढळले. अशा परिस्थितीत गावात राहणे त्यांना कठीण झालं आहे. त्यामुळं सर्वोच्च न्यायालयानं आपल्याला आपली मूळ ओळख परत द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
सर्वोच्च न्यायालयानं त्यांना क्लीन चीट दिली तर ही परिस्थिती सुधारेल अशी त्यांना खात्री वाटते. याच आशेवर त्यांनी सर्वोच्च न्यायालयाची वाट धरली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Supreme court