जयपूर, 21 जुलै : ज्या दोघांचं लग्न (Marriage) होणार आहे, त्यांना वेगवेगळ्या पिंजऱ्यात (Cage) बंद केलं आणि त्यांचं लग्न लावलं असं सांगितलं, तर कदाचित तुमचा त्यावर विश्वास बसणार नाही. मात्र हे प्रत्यक्षात घडलं आहे. एकदा नव्हे, तर वारंवार घडलं आहे. परंपरेनुसार अशी लग्नं लागत आली आहेत. नुकतंच असं लग्न पार पडलं राजस्थानमध्ये. हे लग्न होत बेडकांचं. (Marriage of frogs)
राजस्थानच्या अटरू या आदिवासी विभागात हा अनोखा विवाहसोहळा पार पडला. या भागातील वेगवेगळ्या गावची आदिवासी मंडळी अगदी उत्साहानं, नटून-थटून या लग्नाला हजर राहिली होती. ऐन लग्नात वरानं किंवा वधूनं पळ काढू नये, यासाठी त्यांना पिंजऱ्यात बंद करण्यात आलं होतं. हा अनोखा लग्नसमारंभ मंगळवारी पार पडला. आषाढ महिना संपत आला तरी पावसानं म्हणावा तसा जोर धरला नसल्यामुळे इंद्रदेवाला प्रसन्न करण्यासाठी बेडकांचं लग्न लावण्याची प्रथा आदिवासी समाजात आहे.
काय आहे प्रथा
वर्षानुवर्षं जंगलात राहणाऱ्या आदिवासी समाजाची उपजिविका ही निसर्गाच्या कृपेवर अवलंबून असते. आपल्या नावे असलेली शेती कसून हे आदिवासी आपली गुजराण करत असतात. त्यामुळे वेळेत पाऊस पडला नाही, तर आदिवासींच्या पिकांचं नियोजन बिघडतं आणि त्याचा परिणाम संपूर्ण वर्षाच्या अर्थशास्त्रावर होत असतो. त्यामुळे आषाढ महिन्यात बेडूक आणि बेडकिणीचं लग्न लावून अधिकाधिक पाऊस पडु दे, अशी विनंती आदिवासी समाजातर्फे करण्याची ही जुनी पद्धत आहे. एका गावातील नर बेडूक आणि दुसऱ्या गावातील मादी बेडूक या सोहळ्यासाठी आणला जातो. गावकरीदेखील वरपक्ष आणि वधुपक्षाची भूमिका बजावतात. माणसांच्या लग्नाप्रमाणेच सर्व विधी पार पडतात आणि बेडकांचं लग्न लावलं जातं.
हे वाचा -Gold Price Today: सोन्याच्या किंमतींचा आलेख चढताच, आजही दर 47 हजारांपार!
पावसाची प्रतीक्षा
यंदा आषाढ महिना संपत आला तरी राजस्थानमध्ये समाधानकारक पाऊस पडलेला नाही. काही भागात पाऊस कोसळला असला तरी बहुतांश भाग अद्यापही कोरडाच आहे. अनेक भागातील शेतकऱ्यांच्या पेरण्यादेखील झालेल्या नाहीत. त्यामुळे पावसाळ्याचे उरलेले दोन महिने चांगले जावेत आणि भरपूर पाऊस पडावा, अशी विनंती आदिवासी बेडकाच्या लग्नातून करत असतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.