नवी दिल्ली 16 मे : भोपाळच्या भाजपच्या उमेदवार साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांनी नथुराम गोडसेबाबात जे वक्तव्य केलं होतं त्याबद्दल प्रतिक्रिया व्यक्त केली. पक्षाची मी निष्ठावान कार्यकर्ता आहे. पक्षाची जी भूमिका आहे तिच माझी भूमिका आहे असं त्या म्हणाल्या. मात्र मी माफी मागीतो असं स्पष्टपणे त्यांनी म्हटलं नाही. साध्वींनी सार्वजनिक माफी मागावी असा आदेश भाजपने दिला होता. त्यांच्या वक्तव्याचा भाजप निषेध करतो असं भाजपचे प्रवक्ते जीव्हीएल नरसिंह राव यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं. त्यांच्या वक्तव्यांशी भाजप सहमत नाही असंही ते म्हणाले. बेताल वक्तव्यामुळे माफी मागण्याची साध्वी प्रज्ञा यांची ही दुसरी वेळ आहे.
नथुराम हा देशभक्त होता, आहे आणि राहिल असं वक्तव्य साध्वी प्रज्ञासिंग यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर देशभर वादळ निर्माण झालं. काँग्रेस आणि सर्वच विरोधी पक्षांनी भाजपवर टीकेची झोड उठवली होती. त्यामुळे तातडीने पत्रकार परिषद घेत भाजपने हात झटकले आणि साध्वीला कडक समज देण्यात येत असल्याचं सांगत प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला.
BJP's Pragya Thakur says, "Apne sangathan BJP mein nishtha rakhti hun, uski karyakarta hun aur party ki line meri line hai." Earlier in the day, she had said "Nathuram Godse was, is and will remain a 'deshbhakt'." BJP has condemned her statement & asked her to apologise publicly pic.twitter.com/0bPJSsgPaL
— ANI (@ANI) May 16, 2019
या आधी कमल हसन यांच्या वक्तव्यावरूनही राजकारण पेटलं होतं. नथुराम हा स्वातंत्र्यानंतरचा पहिला हिंदू दहशतवादी होता असं हसन यांनी म्हटल्याने वाद निर्माण झाला होता. बेताल वक्तव्यामुळे माफी मागण्याची साध्वी प्रज्ञा यांची ही दुसरी वेळ आहे. या आधी हेमंत करकरे यांच्याबद्दलही त्यांनी अतिशय वादग्रस्त विधाने केली होती.
त्यानंतर देशभर त्यावर गदारोळ निर्माण झाला होता. नंतर त्यांनी ते वक्तव्य परत घेत माफी मागितली होती. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी त्यांच्यावर दहशतवादी स्वरुपाचे आरोप ठेवण्यात आले होते. नऊ वर्ष त्या तुरुंगातही होत्या. नंतर NIAने त्यांचा या प्रकरणात सहभाग नाही असं सांगितल्याने कोर्टाने त्यांना जामीन मंजूर केला होता.
तत्कालीन युपीए सरकारने हिंदू दहशतवाद असा शब्द प्रयोग करून व्होट बँकेचं राजकारण केलं आणि त्यासाठी साध्वी प्रज्ञासिंग यांना त्या कटात गोवलं असा भाजपचा आरोप आहे. काँग्रेसच्या त्या कटाला उत्तर म्हणून साध्वी प्रज्ञासिंग यांना भाजपने भोपाळमधून तिकीट दिलं होतं. काँग्रेसचे दिग्गज नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंग यांच्या विरोधात भाजपने त्यांना निवडणुकीच्या आखाड्यात उतरवलं आहे.
काय म्हणाल्या होत्या साध्वी?
'नथुराम गोडसे देशभक्त होते आणि आहेत. त्यांना दहशतवादी बोलण्याआधी स्वत:कडे पाहावं' भोपाळमधील भाजपच्या उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर म्हणाल्या होत्या. अभिनेते कमल हसन यांनी काही दिवसांपूर्वी नथुराम गोडसे दहशतवादी असल्याचं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. याआधी साध्वा प्रज्ञासिंह यांनी हेमंत करकरेंवर वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. आता नथुराम गोडसेंबाबत केलेल्या वक्तव्यानं पुन्हा एकदा त्या चर्चेत आल्या आहेत.