मुंबई, 10 एप्रिल : औसा येथील जाहीर सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणूक आयोगाच्या नियमांचं उल्लंघन केलं का? असा सवाल निर्माण झाला आहे. कारण, 'पहिल्यांदा मतदान करणाऱ्यांना मी विचारू इच्छितो की, तुमचं पहिलं मत हे बालाकोट येथे हवाई हल्ला करणाऱ्या जवानांना समर्पित करणार का?' लातूरमधील औसा येथील जाहीर सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2019मध्ये पहिल्यांदा मतदान करणाऱ्यांना केलेल्या आवाहनावरून आता निवडणूक आयोगानं महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे रिपोर्ट मागितला आहे. नरेंद्र मोदींनी केलेल्या या विधानावरून विरोधकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली. शिवाय, निवडणूक आयोगानं केलेल्या कारवाईवर आता प्रश्वचिन्ह देखील उपस्थित केले जात आहेत. विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर राजकीय फायद्यासाठी शहीदांचा वापर केला जात असल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, काँग्रेस आणि विरोधकांनी याविरोधात तक्रार देखील दाखल केली आहे. त्यामुळे निवडणूक आयोग आता काय कारवाई करणार? याकडे सर्वाचं लक्ष लागून राहिलं आहे. निवडणूक आयोगानं या संदर्भातील रिपोर्ट तात्काळ सादर करण्याचे आदेश राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना दिले आहेत.
काय म्हटलं होतं निवडणूक आयोगानं
14 फेब्रुवारी रोजी पुलवामा येथे दहशतवादी हल्ला झाला होता. यामध्ये 40 जवान शहीद झाले होते. त्यानंतर भारतानं पाकिस्तानच्या हद्दीत घुसून एअर स्ट्राईक केला होता. यामध्ये 200 ते 300 दहशतवादी ठार झाले होते. विरोधकांनी वायु दलाचं कौतुक तर केलं. पण, सरकारकडे पुरावे मगितले होते. त्यावरून जोरदार आरोप-प्रत्यारोप देखील झाले होते.
लोकसभा निवडणुकीची घोषणा करताना निवडणूक आयोगानं शहीद जवानांचा किंवा वायु दलानं केलेल्या कारवाईचा उपयोग हा प्रचारासाठी करता येणार नाही असं म्हटलं होतं. पण, त्यानंतर देखील पंतप्रधानांनी औसा येथील प्रचारसभेत शहीद जवानांचा उल्लेख केल्यानं आता यामध्ये निवडणूक आयोग काय करवाई करणार हे पाहावं लागणार आहे.
SPECIAL REPORT: स्वदेशी विमानचं स्वप्न भंगलं; 'मेक इन इंडिया'ला झटका