कोची, 17 ऑगस्ट : पती-पत्नीच्या नात्यांमध्ये वादाचे प्रसंग अनेकदा येतात. नवऱ्याकडून बायकोला मारहाण व शारीरिक त्रास दिला गेल्याच्या अनेक तक्रारी असतात. अशी प्रकरणं न्यायालयात जातात; मात्र मानसिक त्रासाबाबत पुरावे गोळा करणं कठीण असतं. त्यामुळे याबाबत फारसं बोललं जात नाही. आता न्यायालयाने याविषयी कडक शब्दांत टिप्पणी केली आहे. बायकोची इतर स्त्रियांसोबत तुलना करणं किंवा निंदा करणं, कमी लेखणं ही क्रूरता (Comparing Wife With Other Women Is Cruelty) असल्याचं केरळ उच्च न्यायालयानं म्हटलं आहे. घटस्फोटाच्या एका खटल्याच्या सुनावणीवेळी न्यायालयानं हे मत मांडलं आहे. 'आज तक'ने याविषयी सविस्तर वृत्त दिलं आहे.
केरळमध्ये घटस्फोटाच्या (Divorce Case) एका प्रकरणाच्या सुनावणीवेळी उच्च न्यायालयाने लग्न झालेल्या महिलांविषयी महत्त्वाचं विधान केलं आहे. उच्च न्यायालयात एका व्यक्तीने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. त्या अर्जदाराचं 2019 मध्ये लग्न झालं होतं. त्यानंतर त्यांच्यात वाद झाले. हे वाद मिटवण्याचा भरपूर प्रयत्न करण्यात आला; मात्र सगळे प्रयत्न फोल गेले. नंतर उच्च न्यायालयात (Kerala High Court) घटस्फोटासाठी अर्ज दाखल करण्यात आला. या प्रकरणातल्या पत्नीनं पतीच्या क्रूर वागण्याविषयी न्यायालयात माहिती दिली होती. 'तू क्यूट नाहीस, मला हवी तशी नाहीस,' असं बोलून नवरा सतत हिणवायचा अशी तक्रार बायकोनं केली होती. त्यावर न्यायालयानं मध्यस्थी करून दोघांना समजावण्याचा प्रयत्न केला होता; मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही. न्यायाधीश अनिल के. नरेंद्रन आणि न्यायाधीश सी. एस. सुधा यांच्या खंडपीठानं याबाबत निर्णय दिला. बायकोची इतर स्त्रियांसोबत तुलना करण्याची मानसिकता म्हणजे क्रूरता असल्याचं खंडपीठानं म्हटलं. अशी वागणूक बायकोनं सहन करावी अशी अपेक्षा करणं चुकीचं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
सुनावणी वेळेवरच होणार, सुप्रीम कोर्टाने शिवसेनेची मागणी फेटाळली
घटस्फोटाच्या या प्रकरणाची सुनावणी करताना न्यायालयानं नवरा-बायकोच्या नात्यावर आणखी प्रकाश टाकला आहे. पती-पत्नी वेगळे झाले आणि जास्त काळ तसे राहिले, तर दोघांपैकी कोणी एकानं जरी घटस्फोटासाठी अर्ज केला, तरी लग्न मोडल्याचं समजलं जातं. घटस्फोटासाठी मानसिक त्रास हेही कारण असू शकतं. सतत निंदा करणं, बायको अपेक्षेनुसार नसल्याचं बोलून दाखवणं, इतर महिलांसोबत तुलना करणं हा मानसिक त्रासच असल्याचं न्यायालयाचं म्हणणं आहे.
परस्परांना समजून घेऊन, समोरच्याचा आहे तसा स्वीकार करूनच संसार टिकवता येऊ शकतो. लग्न झाल्यानंतर सुरुवातीच्या काळात अपेक्षाभंगाचं दुःख असह्य झाल्यानं घटस्फोट होऊ शकतात. कोणतंही नातं फुलण्यासाठी काही कालावधी आवश्यक असतो. याचा अर्थ मानसिक त्रास सहन करणं असा होत नाही. वरवर साधं वाटणारं बोलणंही अनेकदा खोचक व हिणवणारं असतं. त्याचा विचार पती व पत्नी दोघांनीही केला पाहिजे. न्यायालयाचं याविषयीचं विधान सूचक आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.