पाटणा 18 जानेवारी : एका तरुणीच्या संशयस्पद मृत्यूनंतर संतप्त जमावाने पोलीस स्टेशनच पेटवून दिल्याची धक्कादायक घटना बिहारमध्ये घडली आहे. पोलीस आणि नागरिकांची धुमश्चक्री झाली असून जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी गोळीबारही केला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने जादा पोलीस कुमक मागवली आहे.
बिहारच्या कैमूर जिल्ह्यात ही घटना घडली. कैमूर जिल्ह्यातल्या बरौडा या गावातली एक युवतीला बँकेच्या ग्राहक सेवा केंद्रातून पैसे काढायचे होते. मात्र तीन दिवस चकरा मारल्यानंतरही तिला 2 हजार रुपये मिळू शकले नाही. शेवटी वैतागलेल्या त्या तरुणीने रामगढ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली.
पोलिसांनी संबंधीत बँक अधिकाऱ्याला स्टेशनमध्ये बोलावून समज दिली. त्यानंतर जेव्हा ती तरुणी पैसे काढयला गेली त्यानंतर घरी परतच आली नाही. नातेवाईकांनी जेव्हा तिचा शोध घेतला तेव्हा जवळच्या रेल्वे रुळावर ती गंभीर जखमी अवस्थेत आढळून आली. नातेवाईकांनी तिला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं मात्र त्याआधीच तिचा मृत्यू झाला होता.
नागरिकांनी त्या मुलीचं शव घेऊन पोलीस स्टशनमध्ये धडक मारली. त्यानंतर पोलीस आणि गावकऱ्यांमध्ये वाद झाला आणि वादाचं रुपांतर पोलीस स्टेशन पेटवून देण्यात झालं. बँकेच्या त्या अधिकाऱ्यानेत तरुणीची हत्या केल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. पोलीस आता प्रकरणाची अधिक चौकशी करत आहे.