नवी दल्ली, 27 ऑक्टोबर : फडणवीस सरकारच्या काळात राबवण्यात आलेली जलयुक्त शिवार योजना (Jalyukta Shivar Yojana) ही तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची महत्त्वाकांक्षी योजना होती. मात्र, या योजनेच्या संदर्भात तक्रारी आल्याने ठाकरे सरकारकडून या संदर्भात चौकशीसाठी एक समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. आता या चौकशी समितीचा अहवाल आला असून त्यांनी या 'जलयुक्त शिवार योजना' ला क्लीन चिट दिली आहे. या संदर्भातील अहवाल समितीने सादर केला आहे. यावर आता देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे.
जलयुक्त शिवारला क्लीन चिट मिळाल्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, अहवाल मी बघितलेला नाहीये पण मला माध्यमातून जे कळत आहे त्याने मला अतिशय आनंद होत आहे. कारण ही जनतेची योजना आहे. मुळात ही जनतेने राबवलेली योजना आहे. 6 लाख कामे झाली आहेत. यापूर्वीही उच्च न्यायालयाने देशभरातील एक्सपर्टची एक समिती तयार केली होती त्या समितीने ही योजना कशी योग्य आहे हे आणि कसं योग्य काम यात झालं आहे याचा रिपोर्टही दिला होता. तो रिपोर्टही उच्च न्यायालयाने स्वीकारला होता. हे खरं आहे की योजनेबाबत काही तक्रारी असू शकतात. त्याबाबत चौकशीही झाली पाहिजे अशी मी घोषणा मी स्वत: केली होती. 6 लाख कामे झाली आहेत त्यापैकी 600 कामांची चौकशी होणं ही काही मोठी गोष्ट नाही. जी चुकीची गोष्ट आहे त्याचं मी समर्थन करणार नाही. पण त्याकरता योजनेला बदनाम करणं योग्य ठरणार नाही.
जलयुक्त शिवार ही जनतेची आणि जनतेने राबविलेली योजना! उच्च न्यायालयाद्वारे स्थापित देशभरातील तज्ञांच्या समितीने सुद्धा हीच बाब सांगितली होती. त्यामुळे संपूर्ण योजनेला बदनाम करणे, हे चुकीचेच होते. आता योजनेच्या फायद्यांबाबत सरकारनेच उत्तर दिले आहे.#जलयुक्तशिवार #JalYuktShivar pic.twitter.com/3FaMuMH6EH
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) October 27, 2021
वाचा : समीर वानखेडे यांच्याबाबत आत्तापर्यंतचा सर्वात मोठा गौप्यस्फोट
जलयुक्त शिवारला बदनाम करणाऱ्यांचे 'दात घशात गेले' - आशिष शेलार
जलयुक्त शिवार योजनेला बदनाम करणाऱ्या महाराष्ट्र विकास आघाडीने या योजनेची चौकशी करुन स्वतःच आपले दात आपल्या घशात घातले, अशा प्रकारचे चित्र आहे अशी प्रतिक्रिया भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी दिली.
जलयुक्त शिवार योजनेच्या चौकशीसाठी समिती नियुक्त करण्यात आली. त्यावेळी आघाडी कडून आरोप करण्यात आले होते की, या योजनेच्या कामात गुणवता नाही, सिंचन क्षमता वाढली नाही, पारदर्शकता नाही. मग चौकशी अंती आता तुमच्या जलसंधारण विभागाने काय उत्तर दिली ?. जलयुक्त शिवार मुळे संरक्षित सिंचनाची व्यवस्था झाली, नगदी पिकांमध्ये शेतकऱ्यांची कमाई वाढली, लागवडीचा क्षेत्रफळ वाढले, भूगर्भातील पाण्याची पातळी वाढली, यासाठी जी टेक्नॉलॉजी वापरली होती आणि फोटो जीओ मँपिंग केले गेले त्यात गुणवत्ता आणि पारदर्शकता ठेवली गेली, आणि याच्यामध्ये गावकऱ्यांची सहभागिता होती असंही आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.
मग या सगळ्या गोष्टी जलसंधारण विभाग चौकशीअंती बोलत असेल तर केवळ अहंकारापोटी आणि राजकीय द्वेषापोटी तुम्ही या जलयुक्त शिवारला बदनाम केलं. हे सिध्द होते. राजकीय व्देषातून आघाडी सरकारने महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचा अपमान केला, शेतकऱ्यांचे नुकसान केले, आता तुमचेच दात तुमच्या घशात गेले ना? असा सणसणीत टोला आमदार आशिष शेलार यांनी आघाडी सरकारला लगावला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP, Devendra Fadnavis, महाराष्ट्र