नवी दिल्ली, 2 डिसेंबर : देशाची राजधानी दिल्लीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. आयकर विभागाने (Income Tax) 24 नोव्हेंबरला एका डेअरीवर आणि दुग्ध पदार्थांचं उत्पादन करणाऱ्या कंपनीवर धाड (Raid) टाकली होती. ही कंपनी मुळची पुण्याची आहे. पुण्याच्या एका दूध संघाशी संबंधित ही कंपनी असल्याची माहिती समोर आली आहे. या धाडीनंतर मिळालेल्या माहितीच्या आधारावर आयकर विभागाने आणखी काही ठिकाणी धाडी टाकल्या. या कारवाईतून आयकर विभागाच्या हाती तब्बल 400 कोटींची बेहिशोबी मालमत्ता लागली आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळकडून (Central Board of Direct Taxation) याबाबत अधिकृत माहिती देण्यात आली आहे. 'पीटीआय'ने याबाबतचं वृत्त दिलं आहे.
"आयकर विभागाने 24 नोव्हेंबरला एका डेअरीवर आणि दुग्ध पदार्थांचं उत्पादन करणाऱ्या कंपनीवर धाड टाकली होती. या धाडीच्या आधारावर मिळालेल्या माहितीच्या आधारावर जवळपास सहा शहरांमध्ये विविध 30 ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या. त्यातून तब्बल 400 कोटींची बेहिशोबी मालमत्ता मिळाली आहे", असं सीबीडीटीने सांगितलं आहे.
हेही वाचा : भारतात ओमायक्रोनचा शिरकाव, महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर दोन रुग्ण
आयकर विभागाने केलेल्या या कारवाईत बेहोशी रोकड आणि 2.50 कोटींचे दागिने जप्त करण्यात आले होते. याशिवाय काही बँक लॉकरचा तपास केला जातोय, असं सीबीडीटीने निवेदनात म्हटलं आहे. विशेष म्हणजे या कारवाईत अनेक दोषी कागदपत्रे आणि करचुकवेगिरीचे पुरावे सापडल्याची माहिती सीबीडीटीकडून देण्यात आली आहे. या कागदपत्रांचा तपास केला असता बोगस खरेदीचा दावा करणे, बेहिशेबी खरेदी-विक्री, रोख कर्ज व्यवहार आणि त्याची परतफेड याबाबत अस्पष्टता आढळली आहे. तसेच अशा विविध मार्गांचा वापर करुन करपात्र उत्पन्नाची चोरी झाल्याचे स्पष्टपणे दिसून आल्याचं सीबीडीटीने सांगितलंय. विशेष म्हणजे त्या कागदपत्रांमध्ये पशुधनाची विक्री किंवा मृत्यू झाल्यामुळे झालेल्या नुकसानीचा चुकीचा दावा केल्याची उदाहरणेही लक्षात आली आहेत, असंदेखील केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने सांगितलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.