नवी दिल्ली, 24 मार्च : पश्चिम बंगालच्या कोलकात्यामध्ये (Kolkata) नुकतीच घडलेली घटना. कोरोनाव्हायरसमुळे (Coronavirus) मृत्यू झालेल्या रुग्णाच्या अंत्यसंस्काराला लोकांनी विरोध केला. कोरोनाचा प्रसार होईल, असं सांगत रुग्णाचं शरीर शहरात आणू दिलं नाही. मात्र खरंच मृतदेहामुळे कोरोनाव्हायरस पसरण्याचा धोका आहे का? याबाबत तज्ज्ञांचं काय म्हणणं आहे ते जाणून घेऊयात.
न्यूज 18 लोकमतशी बोलताना महाराष्ट्र IMA चे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी सांगितलं, "कोरोना विषाणूच्या संसर्गाने आजार होऊन मृत्यू पावणाऱ्याची संख्या वाढत चालली आहे. मृतदेहामध्ये कोरोनाव्हायरस किती काळ राहतो याबद्दल अजून संशोधकांना अद्याप खात्रीलायक माहिती मिळालेली नाही. आजमितीला रुग्ण मृत्यू पावल्यावर त्यापासून विषाणूंचा संसर्ग इतरांना होतो किंवा नाही, याबद्दल
खात्रीपूर्वक माहिती नाही"
हे वाचा - धक्कादायक! बंगालमध्ये कोरोनाचा पहिला बळी, भारतातील मृतांची संख्या 9 वर
त्यामुळे मृतदेहाचा अंत्यविधी करताना घ्यायची काळजी महत्वाची ठरते. यासाठी काही संकेत जागतिक आरोग्य संघटना आणि भारत सरकारने प्रसिद्ध केले आहेत, असं डॉ. भोंडवे यांनी सांगितलं.
१) मृतदेह इस्पितळातून पाठवताना स्वच्छ आणि निर्जंतुक कपड्यांमध्ये किंवा बॉडीबॅगमध्ये पूर्ण गुंडाळून
पाठवावा. ही बॉडीबॅग कुठेही फाटलेली नसावी. त्यातून पाणी किंवा द्रव पदार्थ बाहेर जाणार नाही अशी
असावी. कोरोना संसर्गाने मृत झालेल्या व्यक्तीच्या, नाकातोंडातून असे द्राव मरणोत्तर अवस्थेतही
शरीराबाहेर येत राहण्याची शक्यता असते.
२) मृतदेहाला सजवणं, अंघोळ घालणं, त्याचं चुंबन घेणं, मिठी मारणं, त्यावर काही धार्मिक विधी करणं,
त्याला स्पर्श करणं या गोष्टी प्रकर्षानं टाळाव्यात. मात्र देहाभोवती बसून धार्मिक पठण किंवा स्पर्श न करता
मंत्रोच्चार केलेले चालतील.
३) दहनभूमीच्या कर्मचाऱ्यांच्या सह्याने शेवटचं दर्शन घेण्यासाठी बॉडीबॅगचे तोंड 5 मिनिटं उघडं ठेवता
येईल.
हे वाचा - देशात कोरोना रुग्णांची संख्या 519वर, महाराष्ट्र 107 तर केरळ 87 रुग्ण
४) मृतदेहाचं शवविच्छेदन करू नये. जर अतिशय आवश्यक असेल तरच सर्वतोपरी प्रतिबंधक उपाय करून
शवविच्छेदन करावं.
५) अंत्ययात्रेसाठी गर्दी होऊ देऊ नये. मृताच्या नातेवाईकांमध्ये हा आजार असण्याची शक्यता असतं.
मृतदेहामध्ये विषाणू किती काळ राहतो, याबद्दल अजून संशोधकांना अद्याप खात्रीलायक माहिती
मिळालेली नाही. त्यामुळे या देहाचं दफन न करता दहन करावं असा संकेत आहे.
६) मृतदेहाला उचलणाऱ्या आणि त्याला एका जागेवरून दुसऱ्या जागी नेणाऱ्या व्यक्तींनी आणि
दहनभूमीच्या कर्मचाऱ्यांनी पूर्ण बाह्यांचा, संपूर्ण शरीराला झाकणारा, विल्हेवाट लावण्याजोगा
(डिस्पोझेबल) अंगरखा, मास्क आणि ग्लोव्हज वापरावेत.
हे वाचा - फक्त 'या' एका व्यक्तीमध्ये आहे महाभयानक Coronavirus ला रोखण्याची ताकद
महाभयंकर अशा कोरोनाचा प्रसार भारतात वेगाने होत आहे. भारतात आतापर्यंत कोरोनानं 10 लोकांचा जीव घेतला आहे, तर कोरोना लागण झालेल्या रुग्णांची संख्या 500हून जास्त आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.