नवी दिल्ली 17 डिसेंबर: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी रस्ते वाहतुकीच्या संदर्भात मोठी घोषणा केली आहे. पुढच्या दोन वर्षांमध्ये भारताला टोल नाक्यांपासून मुक्ती देणार असल्याची घोषणा त्यांनी केली. केंद्र सरकार रशियाच्या मदतीने Global Positioning System (GPS) टेक्नोलॉजीचा वापर केल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचं (NHAI) टोल उत्पन्न 5 वर्षांमध्ये 1.34 ट्रिलियनपर्यंत वाढणार आहे. यासंदर्भात संबंधित विभागांची नुकतीच एक बैठक झाली असून त्यात सादरीकरण करण्यात आलं आहे. या नव्या रचनेमुळे 1,34,000 कोटींचं उत्पन्न वाढणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
गेल्या वर्षभरापासून केंद्र सरकारने वाहनांना फास्ट टॅग सक्तीचं केलं होतं. त्यामुळे इंधनातही मोठी बचत झाल्याचं आढळून आलेलं आहे. मात्र अजुनही अनेक वाहनांनी फास्ट टॅग लावलेलं नाही. महाराष्ट्रात सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना नितीन गडकरी यांनी टोल प्रणाली देशात पहिल्यांदा सुरू केली होती.
कॅशलेस व्यवहारामुळे पारदर्शकता येईल आणि भ्रष्टाचारही कमी होणार आहे. केवळ फास्ट टॅगमुळे उत्पन्नात 70 कोटींवरून 90 कोटींपर्यंत वाढ झाली आहे. टोल नाक्यांच्या व्यवहारात प्रचंड गैर व्यवहार होत असल्याच्या तक्रारीही कायम होत असतात. त्याबद्दल प्रचंड नाराजीही व्यक्त केली जात होती. यात सुधारणा करून काहीतरी नवी प्रणाली तयार करण्याचाही आग्रह कायम होत असतो.
त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून यात काय करत येईल यावर रस्ते वाहतूक मंत्रालय विचार करत होतं. सर्वाधिक गर्दीचं शहर असलेल्या मुंबईत तर टोल नाक्यांमुळे वाहतुकीला प्रचंड अडथळा येत असतो. ही नवी प्रणाली सक्षमपणे लागू झाली तर या सगळ्या कटकटींपासून वाहन चालकांची सुटका होणार आहे.