हिसार (हरियाणा), 4 डिसेंबर : वेळ कुणासाठी थांबत नाही असं म्हणतात. जीवनचक्र सतत चालत असतं. रोजच्या धकाधकीत आपली किती तरी कामं अर्धवटच राहून जातात. कामाच्या व्यग्रतेत आपण आपल्या अनेक जुन्या गोष्टी विसरतो. अर्थात आपल्याला आपण सोडून आलेल्या रस्त्यांवर परत जायची इच्छा असते, ते सुंदर दिवस पुन्हा अनुभवावेत असं वाटत असतं; पण आपण जाऊ शकत नाही. पुन्हा त्या जुन्या ठिकाणी गेलो तर जुन्या आठवणींनाही उजाळा मिळतो आणि अनेक नवीन आठवणीही तयार होतात. याचाच प्रत्यय देणारी एक घटना हरियाणात (Haryana) हिसारमध्ये (Hisar) घडली आहे. या घटनेमुळे आपल्या जवानांबद्दलचा आदर पुन्हा एकदा द्विगुणित झाला आहे.
हिसारमध्ये एका मिठाईवाल्याची उधारी तब्बल 68 वर्षांनंतर चुकती झाली आहे. ही उधारी हिसारमधले निवृत्त नौसेना कमांडर बी. एस. उप्पल (Retired Naval Commander BS Uppal) यांनी फेडली. अर्थातच या परिसरात सध्या हा माजी सैनिक आणि मिठाईवाल्याचीच चर्चा सुरू आहे. 85 वर्षांचे उप्पल निवृत्तीनंतर आपल्या मुलाकडे अमेरिकेत राहतात. गेली अनेक वर्षं ते अमेरिकेतच राहतात. त्यांचं गेली अनेक वर्षं भारतात किंवा हिसारमध्ये येणं झालं नाही. आता नुकतेच ते मायदेशात आले आणि हिसारलाही त्यांनी भेट दिली. तेव्हा हिसारमध्ये पोहोचल्यावर सगळ्यात आधी त्यांनी मोती बाजारमधल्या ‘दिल्ली वाला हलवाई’च्या दुकानाला भेट दिली.
हे दुकान शंभूदयाल बन्सल यांनी सुरू केलं होतं. सध्या हे दुकान त्यांचे नातू विनय बन्सल सांभाळतात. शंभू बन्सल यांनी हे दुकान सुरू केलं तेव्हा बी. एस. उप्पल शाळेत शिकत होते आणि याच दुकानात येऊन ते दही पेढे खायचे. 1954 मध्ये शंभूदयाल बन्सल यांच्याकडे त्यांची 28 रुपये उधारी होती. या दुकानातच लस्सीमध्ये पेढे घालून पिणंही त्यांना फार आवडायचं. त्याचेच 28 रुपये द्यायचे राहिले होते. त्याच वेळेस त्यांना शहराबाहेर जायला लागलं. त्यानंतर ते नौदलात भरती झाले. नौदलाच्या नोकरीदरम्यान त्यांचं पुन्हा हिसारला येणं झालं नाही आणि निवृत्त झाल्यानंतर ते थेट अमेरिकेला गेले.
आजच्याच दिवशी नौदल दिवस का साजरा केला जातो? या दिवसाचं महत्व माहिती आहे का?
हिसारची आठवण माझ्या मनात कायमच होती, असं बी. एस. उप्पल यांनी न्यूज 18 शी बोलताना सांगितलं. अमेरिकेत असतानाही हिसारच्या दोन गोष्टी त्यांना प्रकर्षानं आठवायच्या. एक म्हणजे 28 रुपयांची राहिलेली उधारी आणि दुसरं म्हणजे त्यांची शाळा हरजीराम हिंदू हायस्कूल. तिथूनच उप्पल दहावी उत्तीर्ण झाले होते. जवळपास 68 वर्षांनंतर उप्पल यांनी खास आपली शाळा बघण्यासाठी आणि 28 रुपयांची उधारी चुकवण्यासाठी हिसारला भेट दिली. विनय बन्सल यांच्या हातात उप्पल यांनी दहा हजार रुपये ठेवले; मात्र बन्सल यांनी इतकी रक्कम घ्यायला नकार दिला. हे पैसे घेऊन आपल्याला कर्जातून मुक्त करा अशी विनंती उप्पल यांनी बन्सल यांना केली. शेवटी खूप विनवण्या केल्यानंतर विनय बन्सल यांनी हे पैसे घेतले. त्यानंतर उप्पल त्यांची शाळा बघण्यासाठी गेले; मात्र आता त्यांची शाळा बंद पडली आहे. साहजिकच अत्यंत निराश मनानं बी. एस. उप्पल तिथून परतले.
विशेष म्हणजे बी. एस. उप्पल यांनी भारत-पाकिस्तान युद्धात (Indo-pak War) महत्त्वाची भूमिका बजावली होती. पाकिस्तानच्या जहाजाला भारताच्या ज्या पाणबुडीनं बुडवलं होतं, त्याच पाणबुडीचे ते कमांडर होते. या घटनेनंतर ते पाणबुडी आणि जवानांना घेऊन सुरक्षित परतले होते. याच शौर्याबद्दल बी. एस. उप्पल यांना शौर्य पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं. आपल्या जवनांच्या माणुसकीबद्दल नेहमीच बोललं जातं. उप्पल यांच्या वागण्यातून त्याचीच प्रचीती येते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Army, Indian army, Indian navy