अभिषेक पांडे, नवी दिल्ली, 3 जुलै : कोरोना व्हायरसचा महाराष्ट्रातील प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे प्रशासनासह सरकारही चिंतेत आहे. अशातच भारतात कोरोना लस तयार होण्याच्या प्रक्रियेला गती आल्याने काहीसा दिलासा व्यक्त करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आयसीएमआर (Indian Council of Medical Research) चे प्रमुख बलराम भार्गव यांच्यासोबत चर्चा केली आहे.
कोरोना लशीची क्लिनिकल चाचणी आणि साधारण कधीपर्यंत ही लस उपलब्ध होऊ शकते, याबाबत राजेश टोपे यांनी आयसीएमआर प्रमुखांसोबत चर्चा केली. तसंच भारत बायोकेटकला लशीबाबत मिळालेल्या यशाबद्दल राज्य सरकारने आनंद व्यक्त केला. तसंच आगामी काळात ही लस कोरोनाला हरवण्यात यशस्वी होईल, असा विश्वासही व्यक्त केला.
महाराष्ट्र करणार अधिक कोरोना लशींची मागणी
भारत बायोटेकने विकसित केलेल्या कोरोना लशीच्या मानवी क्लिनिकल चाचण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे चाचण्यानंतर या लशीला यश मिळाल्यास महाराष्ट्र सरकार केंद्राकडे या लशीचा जास्तीत जास्त पुरवठा व्हावा, यासाठी प्रयत्न करणार आहे. तसंच या लशीच्या चाचणीला परवानगी देण्यात आल्यानंतर नागरिकांमधील कोरोनाची भीती कमी झाल्याचंही राजेश टोपे यांनी या चर्चेवेळी म्हटलं आहे.
लशीच्या चाचण्यांना मिळाली मान्यता
कोरोनाच्या उपचारांसाठी काही औषधे बाजारात आली आहेत, पण उपचारासाठी याची पूर्णपणे हमी दिलेली नाही. अशा परिस्थितीत केवळ लसच कोरोनापासून लोकांना वाचवू शकते. ह्युमन ट्रायलनंतर 15 ऑगस्टपर्यंत भारत बायोटेक, ICMR कडून ही लस भारतात लाँच केली जाऊ शकते असाही अंदाज लावला जात आहे. 7 जुलैला पहिल्यांदा ह्युमन ट्रायल करण्यासाठी परवानगी मिळाली आहे.
संपादन - अक्षय शितोळे