Hathras Gang rape : राहुल गांधींना धक्काबुक्की; उत्तर प्रदेशातील पोलिसांनी केली अटक
हाथरस येथे पीडित कुटुंबीयांच्या भेटीसाठी निघालेल्या राहुल गांधींना पोलिसांनी अडवलं आणि धक्काबुक्कीत ते रस्त्यावर पडल्याची माहिती समोर आली आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर मोठी खळबळ माजली आहे.
हाथरस, 1 ऑक्टोबर : काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी हे हाथरस प्रकरणातील पीडित मुलीच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी निघाले होते. राहुल गांधी यांनी तेथील काही जणांकडून अडविण्यात आले व उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांना धक्काबुक्की केली. त्यानंतर राहुल गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी अटक केल्याची माहिती समोर आली आहे.
हाथरस येथे झालेल्या सामूहिक बलात्काराचे पडसाद संपूर्ण देशभरात पसरत आहे. आज हाथरस येथे 144 कलमाअंतर्गत जमावबंदी लागू करण्यात आल्याने तेथे कोणालाही जाण्यास बंदी घालण्यात आली होती. देशभरातून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे.
हाथरस येथे जाण्यासाठी परवानगी घ्यावी लागेल असे पोलिसांकडून सांगण्यात येत होतं. यामध्ये उत्तर प्रदेशच्या पोलिसांनी राहुल गांधी यांची कॉलर पकडण्यात आल्याचे सांगितले जात आहे व पोलिसांसोबत झालेल्या धक्काबुक्कीत राहुल गांधी जमिनीवर कोसळले. यावेळी त्यांच्यासोबत काही काँग्रेस कार्यकर्ते व नेतेही होते. मात्र अशाही परिस्थितीत राहुल गांधी यांनी पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेणार असल्याचे सांगितले...'कितीही झालं तरी मी पीडित मुलीच्या कुटुंबीयांची भेट घेतल्याशिवाय जाणार नाही', असे ते यावेळी पोलिसांना सांगत होते. या धक्काबुक्कीत मोठा जमाव येथे उपस्थित होता. त्यांच्या या धक्काबुक्कीची व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे.
#WATCH Just now police pushed me, lathicharged me and threw me to the ground. I want to ask, can only Modi Ji walk in this country? Can't a normal person walk? Our vehicle was stopped, so we started walking: Congress leader Rahul Gandhi at Yamuna Expressway,on his way to #Hathraspic.twitter.com/nhu2iJ78y8
हाथरस येथे काही दिवसांपूर्वी एक मुलीवर सामूहिक बलात्काराची घटना समोर आली होती. यामध्ये मुलीची जीभ कापण्यात आली होती व शिवाय तिच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा असल्याचीही माहिती समोर आली होती. उपचारादरम्यान या मुलीचा मृत्यू झाला. त्यानंतर कुटुंबीयांची परवानही न घेता त्या मुलीवर रात्री 2.30 च्या दरम्यान पोलिसांनी अंत्यसंस्कार केल्याचे समोर आल्यानंतर मोठा गदारोळ झाला. देशभरातून आक्रोश व्यक्त केला जात आहे. आणि पुन्हा एकदा उत्तर प्रदेशातील कायदा सुव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. काँग्रेस सरकारनेही योगी सरकारच्या या कारवाईवर संताप व्यक्त करीत राजीनाम्याची मागणी केली आहे. दरम्यान ते आज पीडित मुलीच्या कुटुंबीयांच्या भेटीसाठी हाथरस येथे गेले होते.