सुरेंद्र सिंह, रायपूर, 21 एप्रिल : कोरोना व्हायरसमुळे लग्न समारंभ तर सोडाच पण एकमेकांना साधं भेटणही शक्य होत नाही आहे. अशातच छत्तीसगडमधील एका लग्नाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. लॉकडाऊनमुळे मुंबईत अडकलेला नवरा आणि बरेलीमध्ये राहणारी नवरी या दोघांची लग्नगाठ रायपूरमधून एका भटजीबुआंनी बांधली आहे. ऑनलाइन पार पडलेल्या या विवाहसोहळ्याची या तीनही शहरांमध्ये सध्या वाहवा होत आहे.
वेगळ्या ढंगात पार पडलेल्या या लग्नामध्ये मंडप सजला, शहनाई-ढोल वाजले मात्र गर्दी करण्यास बंदी असल्यामुळे वरात नाही निघाली. नवरोबा देखील तयार होऊन ऑनलाइन आला आणि नवरी देखील नटूनथटून ऑनलाइन आली. ठीक पाच वाजता विधींना सुरूवात झाली. प्रसिद्ध पंडित पीएस त्रिपाठी यांनी हा विवाह सोहळा पूर्णत्वास नेला. एवढचं नव्हे तर वधूवरांना अमेरिका, कॅनडा, पुणे, रायपूर आणि बरेली याठिकाणी राहणाऱ्या शेकडो नातेवाईकांनी ऑनलाइन आशीर्वाद दिले. डांग आणि नांगर परिवारामध्ये पार पडलेलं लग्न परिसरात कौतुकाचा विषय बनत आहे.
(हे वाचा-डॉक्टर दाम्पत्याला सलाम, काळजाच्या तुकड्याला कुलुपबंद करून जावं लागतं रुग्णालयात)
ऑनलाइन लग्नाला परवानगी कशी देणार यावरून काही जणांनी प्रश्न देखील उपस्थित केले मात्र दोन्ही परिवारातील सदस्यांनी या पद्धतीचा स्वीकार केल्याने कोणतीही अडचण नसल्याची माहिती मिळते आहे.
डेस्टिनेशन वेडिंगचा होता प्लॅन
छत्तीसगडची राजधानी रायपूरच्या शंकर नगरमध्ये राहणाऱ्या संदीप डांग यांचा मुलगा सुषेण याचं लग्न बरेलीच्या कृष्ण कुमार नांगर यांची मुलगी किर्ती हिच्याबरोबर होणार होतं. 19 एप्रिलला उत्तराखंडमधील एका रिसॉर्टमध्ये या दोघांचं डेस्टिनेशन वेडिंग होणार होतं. पत्रिका वाटल्या होत्या, रिसॉर्ट बूक केलं होतं आणि इतर सर्व तयारी देखील झाली होती. मात्र या दरम्यान लॉकडाऊन सुरू झाला आणि सर्व काही फसलं. परिणामी या जोडप्याने ठरलेल्या मुहूर्तावरच ऑनलाइन लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि हे अनोखं लग्न पार पडलं.
संपादन - जान्हवी भाटकर
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.