लोहितपूर, ६ एप्रिल : लोकसभा निवडणुकीसाठी ११ एप्रिलला पहिल्या टप्प्याचं मतदान आहे पण देशात एक जागा अशी आहे जिथे हे मतदान सुरूही झालं. भारत -तिबेट सीमा सुरक्षादलाच्या अरुणाचल प्रदेशमधल्या चौकीवर ५ एप्रिलला हे मतदान घेण्यात आलं.
भारत - तिबेटची ही सीमा अरुणाचल प्रदेशमधून जाते. इथल्या लोहितपूरमध्ये पोस्टखात्याच्या माध्यमातून पोलीस कर्मचाऱ्यांनी मतदान केलं. अरुणाचल प्रदेशमध्ये लोकसभेसोबतच विधानसभा निवडणूकही आहे.त्यामुळे अरुणाचल प्रदेशमधले मतदान दोन निवडणुकांसाठी मतदान करत आहेत. त्यासोबतच भारत - तिबेट पोलीस दलात देशभरातल्या विविध भागांतून आलेले पोलीस कर्मचारीही आहेत. त्यांनी त्यांच्या मतदारसंघातल्या उमेदवारांसाठी हे मतदान केलं.
इ बॅलट्स
सरकारी अधिकारी, सैन्याचे जवान, अधिकारी, सशस्त्र पोलीस दल अशा सेवांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अशा प्रकारे मतदान करण्याचा अधिकार आहे. इलेक्ट्रॉनिक ट्रान्समिटेड पोस्टल बॅलेट सिस्टीम या यंत्रणेच्या माध्यमातून ते आपलं मत नोंदवत आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचे सगळे टप्पे झाल्यानंतर या मतपत्रिका गणनेसाठी पाठवल्या जातील. या पद्धतीला 'इ बॅलट्स' असं म्हटलं जातं.
याआधी या मतदारांना टपालाने मतपत्रिका पाठवल्या जायच्या. मतदान झाल्यानंतर याच मतपत्रिका पुन्हा टपालानेच पाठवल्या जात पण यामध्ये खूप वेळ जायचा. त्यामुळेच ही इलेक्ट्रॉनिक पद्धत सुरू करण्यात आली आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी देशभरात सात टप्प्यांत मतदान होणार आहे. हे मतदान ११ एप्रिलला सुरू होईल आणि १९ मे ला संपेल. मतदानाचा निकाल २३ मे ला लागणार आहे.
लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकांसाठी भारतातल्या नागरिकांनाही पोस्टाद्वारे मतदान करता येतं पण त्यासाठी आधी अर्ज करावा लागतो.
============================================================================================================================================================
VIDEO: अजित पवार म्हणाले... 'पार्थने केलेली चूक फासावर चढवण्याऐवढी गंभीर नाही'