24 फेब्रुवारी : पंजाब नॅशनल बँकेतील ११,४०० कोटींचा घोटाळा उघड झाल्यानंतर एका आठवड्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याप्रकरणावर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. जनतेचा पैसा लुटणाऱ्यांना सरकार माफ करणार नाही. असं म्हणत त्यांनी पीएनबी बँक घोटाळ्यावर आपले मौन सोडले आहे. आर्थिक गैरव्यवहार करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असं नरेंद्र मोदी बोलले आहेत. नवी दिल्लीत आयोजित ग्लोबल बिझनेस समिटमध्ये ते बोलत होते.
सरकार आर्थिक विषयांशी संबंधीत अनियमिततेविरोधात मोठी कारवाई करत असून भविष्यातही करत राहणार आहे, असे पंतप्रधानांनी शुक्रवारी ठामपणे सांगितले. पीएनबी घोटाळ्याचा त्यांनी प्रत्यक्ष उल्लेख केलेला नसला तरी याच मुद्यावर ते बोलल्याचे स्पष्ट होते.