नवी दिल्ली, 04 जून: लोकसभा निवडणुकीत झालेल्या मोठा पराभवानंतर काँग्रेस पक्ष अद्याप सावरला नाही. पराभवाचा धक्का कमी होता म्हणून की काय आता पक्षात बंडखोरीने तोंड उघडले आहे. पक्षातील अनेक आमदारांनी आणि नेत्यांनी रामराम केल्यामुळे ही बंडखोरी कशी थांबवायची असा प्रश्न पक्ष नेतृत्वाला पडला आहे. केवळ महाराष्ट्र काँग्रेस नव्हे तर अन्य राज्यात देखील हीच परिस्थिती आहे.
राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी मुलगा वैभव गहलोतच्या लोकसभा निवडणुकीतील पराभवाचे खापर दुसऱ्या नेत्यावर फोडले आहे. मध्य प्रदेशमधील गुना मधून पराभव झालेल्या ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेस समितीच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी योग्य काम न केल्याचा ठपका ठेवला आहे. शिंदे यांनी थेट मुख्यमंत्री कमलनाथ यांच्यावर आरोप केले आहेत. मुख्यमंत्री स्वत:च्या मुलाला छिंदवाडामधून जिंकवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे शिंदे यांनी म्हटले आहे. दुसऱ्या बाजूला छत्तीसगडमध्ये देखील मुख्यमंत्री पदाचे स्वप्न पाहणाऱ्या अनेक वरिष्ठ नेत्यांनी लोकसभेतील पराभवावर मौन बाळगले आहे.
वाचा- काँग्रेसच्या गोटात खळबळ; 8 ते 10 आमदार भाजपच्या वाटेवर?
महाराष्ट्राचा विचार करायचा झाल्यास पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. लोकसभा निवडणुकीत त्यांनी भाजपकडून लढणाऱ्या मुलाचा देखील प्रचार केला होता. राजीनामा देताना त्यांनी पक्ष नेतृत्वाशी कोणतेही वाद किंवा मतभेद नसल्याचे स्पष्ट केले होते. विखे-पाटलांच्या पाठोपाठ अब्दुल सत्तार यांनी देखील पक्षातील 8 ते 10 आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचे वक्यव्य केले आहे. राज्यातील नेतृत्व पक्षाचे मोठे नुकसान करत असल्याचे सत्तार यांनी म्हटले आहे. काही दिवसांपूर्वीच सत्तार यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती.
कर्नाटकमध्ये देखील काही वेगळी परिस्थिती नाही. काँग्रेसचे नेते रोशन बेग यांनी राज्यातील पक्ष नेतृत्वाला कंटाळून 15 जण पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याचे विधान त्यांनी केले आहे. प्रत्येक जण काँग्रेस पक्षात नाराज आणि असंतुष्ठ आहे. एका बाजूला दिल्लीत पक्ष नवा अध्यक्ष शोधत आहे आणि तेव्हा राज्यात पक्षामध्ये प्रचंड गोंधळाचे वातावरण आहे.
वाचा- युतीमध्ये पुन्हा ठिणगी; मित्रपक्षांना कमळ चिन्ह देण्याचा भाजपचा प्लॅन!
गुजरातमध्ये देखील पक्षासाठी काही चांगली बातमी नाही. 2017मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवणाऱ्या अल्पेश ठाकूर यांनी देखील राजीनामा देणार आहे. ठाकूर यांनी केलेल्या दाव्यानुसार गुजरातमधील 15हून अधिक आमदार पक्ष सोडण्याचा विचार करत आहेत.
VIDEO: हसल्याच्या रागातून युवकाला लोखंडी रॉड आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण