अलाहाबाद, 1 सप्टेंबर : गाय (Cow) हे भारतीय संस्कृतीचं (Indian Culture) अविभाज्य अंग असून गायीला राष्ट्रीय पशू (National Animal) घोषित करण्याची गरज असल्याचं मत अलाहाबाद हायकोर्टानं (Alahabad High Court) व्यक्त केलं आहे. गोहत्या प्रकरणातील आरोपीचा जामीन अर्ज फेटाळून लावताना कोर्टानं हे मत व्यक्त केलं आहे. गोहत्या करणं हा तर गुन्हा आहेच, मात्र गायीला इजा पोहोचवण्याचा विचार करणाऱ्यालादेखील शिक्षा करायला हवी, असं मत न्या. शेखर कुमार यादव यांनी व्यक्त केलं आहे.
गाय ही भारताची संस्कृती
गाय ही भारताची संस्कृती असून तिचा कुठल्याही विशिष्ट धर्माशी संबंध नसल्याचंही कोर्टानं म्हटलं आहे. देशातील गायीचं संरक्षण आणि पालनपोषणं करणं ही प्रत्येक भारतीयाची जबाबदारी आहे. गायीला दुखावणारा प्रत्येकजण हा देशाच्या भावनांशीच एक प्रकारे खेळत असल्याचं मत कोर्टानं व्यक्त केलं आहे.
गायीचं कल्याण हेच देशाचं कल्याण
गायीचं आपल्या देशातील महत्त्व अनन्यसाधारण असून गायीचं कल्याण हेच देशाचं कल्याण असल्याचं मत कोर्टानं व्यक्त केलं. गायीकडे केवळ एक पशू म्हणून न पाहता देशाची संस्कृती म्हणून पाहिलं गेलं पाहिजे आणि त्यासाठी प्रत्येकाने गायीच्या संरक्षणाची जबाबदारी उचलली पाहिजे, असं मत कोर्टानं नोंदवलं. गायींच्या संरक्षणासाठी केंद्र सरकारनं कडक कायदा करणं गरजेचं असून त्याचं पालन होईल याची दक्षता घेणंही गरजेचं असल्याचं मत न्यायालयाने व्यक्त केलं.
हे वाचा - पंतप्रधान मोदींच्या हस्ते जालियनवाला बाग मेमोरियलचं उद्घाटन, पाहा PHOTOs
अलाहाबाद उच्च न्यायालयाचं मत बहुमोल असून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे गायींच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी सज्ज असल्याचं उत्तर प्रदेशचे अल्पसंख्याक मंत्री मोहसीन रजा यांनी म्हटलं आहे. तर हायकोर्टाचं म्हणणं गांभिर्यानं घेत सरकारनं देशपातळीवर याचा विचार करून गोवा, आसामसारख्या राज्यात होणाऱ्या गायींच्या कत्तलीवर बंदी आणली पाहिजे आणि गोव्यातील गोमांस भक्षण बंद केले पाहिजे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसनं दिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cow science, High Court