रत्नागिरी 8 जून : सागरी सुरक्षेविषयी कायम चर्चा होत असताना एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कोकणातल्या दाभोळ खाडीत चीनच्या दोन मासेमारी बोटी आढळून आल्या आहेत. या बोटींवर 37 खलाशी असल्याची माहिती आहे. या बोटी दुरुस्तीसाठी आणल्याचा दावा बोट मालकांनी केला आहे. मात्र या बोटींकडे कुठलीही परवानगी नाही अशी माहितीही पुढे येतेय.
चीनच्या या मासेमारी बोटी दिडशे फुट लांबीच्या आहेत. या मोठ्या बोटी आढळून आल्याने सुरुवातीला सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. दुसऱ्या देशाच्या हद्दीत जाण्यासाठी संबंधीत बोटींना विविध परवानग्या घ्याव्या लागतात. त्यानंतरच अशा बोटी त्या सागरी हद्दीत नेता येतात. त्यामुळे दाभोळ पोलीस आणि विविध सुरक्षा संस्था आता या प्रकरणाची चौकशी करत आहेत.
या प्रकरणी रत्नागिरीतल्या खाजगी मरीन एजन्सीचीही चौकशी सुरु असल्याची माहितीही पुढे आलीय. या बोटींविषयी कुठलीच पूर्वकल्पना नसल्याने त्याविषयीचं गुढ वाढलं आहे. चीनबद्दल कायम संशयाचं वातावरण असल्याने सुरक्षा कारणांबाबातही चिंता व्यक्त करण्यात येत आहेत.
परवानगी नसताना या बोटी जर दाभोळ खाडीपर्यंत आल्या असतील तर त्या एवढ्या आतमध्ये येईपर्यंत कुणालाच कसं कळालं नाही असाही प्रश्न विचारण्यात येतोय. तटरक्षक दल किंवा नौदलाला या बोटींविषयी काही माहिती का कळली नाही असाही प्रश्न आता विचारण्यात येतोय.
या प्रकरणी केंद्रीय सुरक्षा यंत्रणांनाही कळविण्यात आल्याची माहिती आहे. या बोटींकडे कुठलीही परवानगी आढळून आली नाही तर तो सागरी सुरक्षा यंत्रणांना धक्का असणार आहे. या आधाही कोकण किनाऱ्यावरून अवैध शस्त्रास्त्र आल्याची प्रकरणं उघडकीस आली होती.