नवी दिल्ली 17 नोव्हेंबर: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी ब्रिक्स (BRICS) (ब्राझिल, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण अफ्रीका) संमेलनात पाकिस्तानवर जोरदार हल्लाबोल केला. दहशतवाद ही जगासमोरची सगळ्यात मोठी समस्या आहे. काही देश दहशतवाद्यांना मदत करत त्यांचं पालनपोषण करत असतात. अशा देशांवर बहिष्कार घालण्यात यावा असं त्यांनी पाकिस्तानचं नाव न घेता सांगितलं. या देशांना त्यासाठी दोषी धरलं पाहिजे असंही ते म्हणाले. UN, IMF, WTO या जागतिक संघटनांमध्ये मुलभूत सुधारणा करण्याची गरज असल्याचं मतही त्यांनी व्यक्त केलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवादाबद्दल जे मत व्यक्त केलं त्याला रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांनी आपला पाठिंबाही व्यक्त केलाय.
आर्थिक मुद्यांवरून कोंडी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या चीनलाही त्यांनी चांगलेच सुनावले. आत्मनिर्भर भारताच्या घोषणेमुळे इतरांनी घाबरण्याचं कारण नाही. आमच्या प्रगतीमुळे सर्व जगाचचं कल्याण होणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
या संमेलनात रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांच्यासह चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग हेही सहभागी झाले आहेत. चीनसोबतच्या सीमा वादानंतर पहिल्यांदाच जिनपिंग आणि मोदी एकाच संमेलनात सहभागी झाले आहेत. त्यामुळे मोदी काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं.
My intervention during the BRICS Summit. https://t.co/amMz0bw1ro
— Narendra Modi (@narendramodi) November 17, 2020
यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी यांनी आत्मनिर्भर भारताचा उल्लेख केला. कोविड नंतरच्या जागतिक अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी भारताने मोठ्या प्रमाणावर आर्थिक सुधारणा केल्या आहेत. पायाभूत सुविधांमध्ये वाढ केली आहे. त्यामुळेच भारत 200 देशांना औषधांचा पुरवढा करू शकला असंही त्यांनी सांगितलं. कोविड लसचं संशोधन आणि लशींच्या उत्पादनातही भारत जगातल्या अनेक देशांना मदत करेल अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
BRICSच्या स्थापनेला 2021मध्ये 15 वर्ष पूर्ण होतील त्यावेळी या संघटनेने केलेल्या कामांचा आढावा घेणारा रिपोर्ट तयार केला पाहिजे असंही त्यांनी सांगितलं.