नवी दिल्ली, 08 डिसेंबर : काँग्रेस नेते राहुल गांधी सध्या 'भारत जोडो यात्रा' करत आहेत. कन्याकुमारीपासून सुरू झालेली ही पदयात्रा सात राज्यांतून मार्गक्रमण करत आता राजस्थानमध्ये पोहोचली आहे. भारत जोडो यात्रेचा राजस्थानमधला आज (8 डिसेंबर) चौथा दिवस आहे. आतापर्यंत शांततेत पार पडलेल्या या यात्रेला आज कोटामध्ये गालबोट लागलं आहे. कोटामध्ये यात्रेत आज एका भाजपसमर्थक तरुणाने स्वतःला पेटवून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलिसाने आपली वर्दी उतरवून त्याची आग विझवली. नागरिकांनी त्याचा जीव वाचवला.
युवक काँग्रेसच्या धोरणाबद्दल या तरुणाच्या मनामध्ये नाराजी होती. म्हणून त्याने आत्मदहनाचा प्रयत्न केला. याशिवाय, कोटामध्ये प्रचंड गर्दीमुळे चेंगराचेंगरीची परिस्थिती पाहायला मिळाली. अनेकांनी सुरक्षाव्यवस्था भेदून राहुल गांधींपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. 'दैनिक भास्कर'ने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
हे ही वाचा : जडेजाची पत्नी आऊट का नॉटआऊट? जामनगरचे शॉकिंग आकडे
आज (8 डिसेंबर) सकाळी 6 वाजून 15 मिनिटांच्या सुमारास कोटा इथल्या सूर्यमुखी हनुमान मंदिरात पूजा करून यात्रेला सुरुवात झाली. भारत जोडो यात्रेत आज जेवणाचा ब्रेक नसून, आजची यात्रा सकाळी 11.30 वाजता संपणार आहे. कोटा जिल्ह्यातल्या प्रवासाच्या वेळापत्रकात बदल करून यात्रेचा आजचा कालावधी कमी करण्यात आला आहे. ही यात्रा आज सलग 24 किलोमीटरचं अंतर कापणार आहे. भदाणा हा आजच्या यात्रेचा शेवटचा मुक्काम असेल. बुंदी जिल्ह्यातल्या केशोराईपाटन इथे राहुल गांधींच्या यात्रेसाठी कॅम्प लावण्यात आला असून, तिथे पुढील दोन दिवस रात्रीचा मुक्काम असणार आहे.
राहुल गांधी यांनी कोचिंगसाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचीही भेट घेतली. ते मुलांना म्हणाले की, 'तुम्ही देशाचं भविष्य आहात...लव्ह यू.' आज सकाळपासून भारत जोडो यात्रेने सुमारे 10 किलोमीटरचं अंतर कापलं आहे. विमानतळावरच्या टी-ब्रेकनंतर प्रवास पुन्हा सुरू झाला आहे.
आजच्या प्रवासानंतर राहुल गांधी रणथंबोरमध्ये सोनिया गांधींना भेटायला जाऊ शकतात. सोनिया गांधी सवाई माधोपूरमधल्या रणथंबोर इथे आपला वाढदिवस साजरा करतील. त्या वेळी राहुल गांधीही त्यांच्यासोबत असतील. सोनियांच्या वाढदिवसामुळे 9 डिसेंबर रोजी राहुल गांधींच्या यात्रेला विराम देण्यात आला आहे. यानंतर 10 डिसेंबरला राहुल गांधींसोबत फक्त महिला प्रवासी चालतील. या दिवशी सोनिया गांधीदेखील यात्रेत सहभागी होण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातल्या महिलांसाठीही असाच एक दिवस ठेवण्यात आला होता.
कोटामधलं यात्रेचं वेळापत्रक बदलल्याने राजकारण चांगलंच तापलं आहे. याआधी बुधवारी (7 डिसेंबर) सचिन पायलट यांची पोस्टर्स-बॅनर्स हटवण्यावरून राजकीय तणावाचं वातावरण पाहायला मिळालं होतं; मात्र जयराम रमेश यांनी कार्यक्रमात असे बदल होणं सर्वसाधारण असल्याचं म्हटलं आहे.
हे ही वाचा : दुखापतीमुळे बांगलादेश दौऱ्यातून माघार, पण टीम इंडियाचा हा क्रिकेटर बायकोसाठी करतोय 'हे' काम
राहुल यांच्यासोबत मुख्यमंत्री अशोक गेहलोत, सचिन पायलट असे मोठे नेतेही उपस्थित आहेत. कोटामधल्या यात्रेदरम्यान झालेली प्रचंड गर्दी पाहून राजकीय चर्चांनाही उधाण आलं आहे. कोटामध्ये यात्रेत जमलेल्या गर्दीकडे राजस्थान सरकारमधले शक्तिशाली मंत्री शांती धारिवाल यांचं शक्तिप्रदर्शन म्हणून पाहिलं जात आहे. धारिवाल हे कोटाचे आमदार आहेत आणि ते गेहलोत यांच्या जवळच्या मंत्र्यांपैकी एक आहेत. नागरी विकास आणि गृहनिर्माण मंत्री असलेल्या धारिवाल यांना कोटाचा विकास राहुल गांधींच्या नजरेत आणायचा होता; पण राहुल यांनी कोटातला कार्यक्रम आटोपता घेतला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bharat Jodo Yatra, BJP, Congress, Madhya pradesh, Rahul gandhi