नवी दिल्ली 10 डिसेंबर: पश्चिम बंगालमध्ये भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा (BJP President JP Nadda) यांच्यावर झालेल्या हल्ल्याची केंद्रीय गृहमंत्रालयाने गंभीर दखल घेतली आहे. नड्डा यांना पश्चिम बंगाल सरकारने (west-bengal-government) योग्य सुरक्षा व्यवस्था पुरवली नाही असं पुढे आल्याने गृहमंत्रालयाने राज्य सरकारकडे अहवाल मागितला आहे. नड्डा यांच्या कारच्या ताफ्यावर तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला होता. त्यात काही नेत्यांना दुखापतीही झाली होती. मी केवळ दुर्गा मातेच्या कृपेमुळेच वाचलो अशी प्रतिक्रिया नड्डा यांनी व्यक्त केली होती.
त्यानंतर पत्रकार परिषद घेत नड्डा यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. ममता दीदी यांच्या सरकारचे आता फक्त काही दिवसच राहिले आहेत. त्यामुळे त्यांनी आपल्या गुंडांना रोखलं पाहिजे नाहीतर त्याचे गंभीर परिणाम होतील असा इशाराही त्यांनी दिला आहे. राज्यपालही केंद्र सरकारला आपला अहवाल पाठवणार आहेत.
नड्डा हे दौऱ्यावर असताना त्यांच्या ताफ्याला तृणूलच्या कार्यकर्त्यांनी घेरलं होतं. त्यानंतर दगडफेक करण्यात आली. यात भाजपचे राज्यप्रभारी कैलाश विजयवर्गीय हे जखमी झालेत तर नड्डा यांच्या गाडीची काच फुटली. त्यानंतर त्यांच्या सुरक्षेत असलेल्या सुरक्षा दलाने त्यांना सुखरूप बाहेर काढलं.
राज्यात विधानसभा निवडणुकीला वर्षभराचा कालावधी आहे. मात्र भाजपने आत्तापासूनच तिथे जोरदार कंबर कसली आहे. गृहमंत्री अमित शहा यांच्यासह वरिष्ठ नेते राज्यात वारंवार जात असून कार्यकर्त्यांना बळ देण्याचा प्रयत्न करत आहे. यातूनच भाजप आणि तृणमूल यांच्या जोरदार संघर्ष घडत असून त्यातून अनेक कार्यकर्त्यांच्या हत्याही झाल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजकीय हिंसाचार न करण्याचं आवाहन करत ममता बॅनर्जी यांना थेट इशाराही दिला होता.