श्रीनगर, २७ ऑक्टोबर, "तो शहीद झालेला जवान सीमाभागात रस्ते बांधणाऱ्या टीमचं रक्षण करत होता. आणि मग काही लोक आम्हाला सांगतात की, काश्मीरमध्ये दगडफेक करणाऱ्यांना दहशतवाद्यांसाठी काम करणाऱ्यांसारखी वागणूक देऊ नका", काश्मीर खोऱ्यात झालेल्या दगडफेकीत एका जवानाचा बळी गेला त्याच्या दुसऱ्याच दिवशी लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी या शब्दांत इशारा दिलाय.
'काश्मीर खोऱ्यात सामान्य नागरिकांचा आव आणत सैन्यावर दगडफेक करणारे काश्मिरी दहशतवाद्यांचे सक्रिय साथीदार आहेत. त्यांच्यावर कडक कारवाईच झाली पाहिजे', असं लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी स्पष्ट केलं.
इस्लामाबादकडून काश्मीरमधल्या दहशतवादी कारवायांना रसद पुरवली जाते. काश्मिरी जनतेला भडकवलं जातं. त्यांनी हे वेळीच थांबवलं नाही तर याचा बंदोबस्त करण्याचे आमच्याकडे अन्य मार्गही आहेत, अशा कडक शब्दांत जनरल रावत यांनी पाकिस्तानला थेट इशारा दिलाय.
इंन्फंट्री डेच्या दिवशीच लष्करप्रमुखांनी हा इशारा दिला आहे. दोन वर्षांपूर्वी भारतीय सैन्य आस्थापनेवर पाकपुरस्कृत अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय सैन्यानं २८ सप्टेंबर २०१६ रोजी पाक हद्दीत शिरून सर्जिकल स्ट्राईक्स केले होते.
सीमेपार दहशतवाद पसरवण्याचे उद्योग पाकिस्तानच्या दृष्टीने घातक आहेत. त्यांनी याची दखल घेत योग्य ते शहाणपण घेतलं नाही तर आम्हाला अन्य मार्ग वापरावे लागतील. आमच्या हद्दीत दहशतवाद्यांनी हिंसा करू नये यासाठी आम्ही त्यांचा बंदोबस्त करू आणि तो कसा करायचा हे आम्हाला चांगलं माहिती आहे, असं ते म्हणाले.
पण भारतीय लष्करातर्फे पाक पुरस्कृत दहशतवाद रोखण्यासाठी नेमकी कोणती कारवाई करण्यात येणार आहे याबाबत मात्र लष्करप्रमुखांनी आणखी माहिती दिली नाही.
LIVE VIDEO : काश्मीरमध्ये १० दहशतवाद्यांचा खात्मा; सुरक्षा दलाशी झालेली चकमक कॅमेऱ्यात कैद