मुंबई 17 नोव्हेंबर : छोट्या पडद्यावर महानायक अमिताभ बच्चन यांचा 'कौन बनेगा करोडपती' (KBC ) हा शो सगळ्यात हिट आहे. यात सगळ्यांना आकर्षण असतं ते अमिताभ आणि त्यांच्या प्रश्नांचं आणि बक्षीसाचं. अमिताभ यांचा आवाज, शब्दांची फेक आणि लाघवी बोलण्यामुळे प्रत्येक जण त्यांच्या प्रेमातच पडतो. या शोमध्ये बक्षीस म्हणून जी रक्कम दिले जाते त्याचे आकडे पाहिले तरी त्यामुळे डोळे विस्फरले जातात. देशातल्या सर्वच गटांमधले आणि स्तरांमधले सामान्य लोक यात सहभागी होत असल्याने तो शो प्रत्येकाला आपला वाटतो. या शो मधून अनेक सामान्य माणसं कोट्यशीध झालेत. मंगळवारी रात्री झालेल्या शोमध्येही बिहारच्या अजित कुमार यांनी उत्तराची खात्री नसल्यामुळे 7 कोटींचा हा प्रश्न सोडला. क्रिकेटवर आधारीत तो प्रश्न होता त्यामुळे त्याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होतेय.
संघर्ष पेटला...कोलकत्यात भाजप कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये तुफान राडा
बिहारच्या हाजीपूर इथं राहणारे अजित कुमार खेळ जिंकत जिंकत 7 कोटींपर्यंत जावून पोहोचले. अजित कुमार हे बिहार पोलिसांमध्ये अधिकारी आहेत. त्यांचा सात कोटींचा प्रश्न होता क्रिकेटवरचा हा प्रश्न जिंकला असता तर त्यांना 7 कोटी मिळाले असते. पण त्यांना उत्तराची खात्री नसल्याने त्यांनी खेळ तिथेच सोडला. कारण त्यांच्या सर्व लाइफ लाईन वापरून संपल्या होत्या.
हा आहे सात कोटींचा प्रश्न
अमिताभ बच्चन यांनी अजित कुमार यांना विचारलेला प्रश्न होता की, कुठल्या क्रिकेटपटूने दोन वेग वेगळ्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 24 तासांमध्ये दोन अर्धशतकं काढली आहेत? त्यांच्यासाठी पर्याय होते. A. नवरोज मंगल B. मोहम्मद हफीज C. मोहम्मद शहजाद आणि D. शाकिब अल हसन.
कुमार यांनी खूप विचार केला मात्र त्यांना त्याचं उत्तर सांगता येत नव्हतं. त्याचबरोबर त्यांच्या सर्व लाइफ लाईनही संपल्या होत्या. नेहमी प्रमाणेच अमिताभ बच्चन यांनी त्यांना सगळी परिस्थिती सांगितली. उत्तर चुकलं तर रिकाम्या हाताने परत जावं लागेल. खेळ सोडला तर एक कोटी मिळतील.
कुमार यांनी खेळ सोडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर अमिताभ यांनी त्यांचा अंदाज विचारला तेव्हा कुमार यांनी त्यांना नवरोज मंगल हे उत्तर दिलं. पण ते उत्तर चुकीचं होतं. या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं मोहम्मद शहजाद. त्यांनी ओमान आणि आर्यलंड विरुद्धच्या दोन T20 सामन्यात धमाकेदार खेळी करत 50-50 धावा केल्या होत्या.