कोलकाता 18 एप्रिल : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी असा दावा केला आहे, की पश्चिम बंगालमध्ये आतापर्यंत झालेल्या पाच टप्प्यातील मतदानामध्ये (West Bengal Assembly Election 2021) भाजप 122 हून अधिक जागांवर विजय मिळवेल. पूर्व बर्द्धमान जिल्ह्यातील एका रॅलीदरम्यान जनतेला संबोधित करताना त्यांनी हा दावा केला आहे. इतकंच नाही तर त्यांनी असंही म्हटलं आहे, की नंदीग्राममध्येही भाजप उमेदवार (BJP Candidate) ममता बॅनर्जींना (Mamata Banerjee) हरवणार, यानंतर त्यांना इथून जावं लागेल.
शाह म्हणाले, की पश्चिम बंगालमधील पाच टप्प्यांच्या निवडणुकांनंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी हताश झाल्या आहेत कारण 122 हून अधिक जागांवर भाजप त्यांच्या पुढे आहे. शाह म्हणाले, भाजप उमेदवार शुभेंदु अधिकारी नंदीग्राममध्ये निवडून येतील. गृहमंत्री पुढे म्हणाले, की बॅनर्जी यांचं स्थान पाहाता त्यांना मोठ्या पराभवानं परत पाठवणं गरजेचं आहे.
शाह यांनी ममता बॅनर्जी यांना झालेल्या दुखापतीचाही उल्लेख केला. ते म्हणाले, आशा आहे की 2 मेपर्यंत दीदींच्या पायाला झालेली दुखापत ठीक होईल. जेणेकरुन राज्यपालांकडे आपला राजीनामा देण्यासाठी त्या पायी जाऊ शकतील. शाह म्हणाले, की भाजप दीदींपेक्षा खूप पुढे आहे. बॉम्ब, बारुद आणि बंदुकीचं मॉडेल विकास आणि व्यापारात बदलण्याची आमची इच्छा आहे. अमित शाह पुढे म्हणाले, की दीदीकडे बंगालच्या विकासासाठी काहीही अजेंडा नाही. दीदी बंगालमध्ये 12 मिनिटे भाषण करतात आणि यातील दहा मिनिटे त्या मला आणि मोदींना शिव्या घालतात. यानंतरचे दोन मिनिट सुरक्षा दलाला दोष देत राहातात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.