गुवाहाटी, 17 फेब्रुवारी : भाजप अध्यक्ष अमित शहा सध्या आसामच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी जाहीर सभेमध्ये बोलताना NRCच्या मुद्यावरून आम्ही आसामचं काश्मीर होऊ देणार नाही. त्यासाठी आम्ही NRCच्या माध्यमातून घुसखोरांचा शोध घेत आहोत. त्यानंतर त्यांना आसाममध्ये थारा दिला जाणार नाही. त्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचं म्हटलं आहे. यावेळी त्यांनी पुलवामा येथे शहिद झालेल्या मनेश्वर बसुमतरी आणि अन्य जवानांना श्रद्धांजली वाहिली. तसेच त्यांनी काँग्रेस आणि आसाम गण परिषदेवर देखील टीका केली. आसाममध्ये सध्या NRCचा मुद्दा गाजत आहे.
दरम्यान, भाजप सरकार सर्व प्रकारच्या दहशतवादाविरोधात लढण्यासाठी कटिबद्ध असून आसामच्या विकासाकडे दुर्लक्ष केलं जाणार नाही असं देखील अमित शहा यांनी म्हटलं आहे. यावेळी मुख्यमंत्री सोनोवाल देखील सभा स्थळी हजर होते.
National Register of Citizens (NRC) म्हणजे काय?
- राष्ट्रीय नागरीकत्व रजिस्टरची सुरुवात युपीएच्या काळात झाली.
- माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी 1985मध्ये केलेल्या आसाम कराराच्या आश्वासनाची पुर्तता करण्यासाठी हे पाऊल उचललं गेलं होतं.
- आसाममध्ये असलेल्या बांगलादेशी घुसखोरांना शोधून काढणं हे याचं मुख्य उद्दीष्ट होतं.
- 62 हजार कर्मचारी, बाराशे कोटी रुपयांचा खर्च करुन राष्ट्रीय नागरीक रजिस्टर नोंदवण्याचं काम करण्यात आलं.
- अशा पध्दतीनं एनआरसी नोंदवणारं आसाम देशातलं पहिलं राज्य ठरलंय.
- या यादीत 24 मार्च 1971च्या मध्यरात्रीपर्यंत भारतात दाखल झालेले लोक भारतीय नागरिक म्हणून ग्रहित धरलं जातय.
- आसाममध्ये 3 कोटी 29 लाख 91 हजार 384 नागरिकांनी एनआरसीत वैधतेसाठी अर्ज केले.
- पैकी 2 कोटी 89 लाख 83 हजार 677 लोकांनी कायदेशीरपणे आपलं नागरिकत्व सिद्ध केलं.
- मात्र 40 लाख 7 हजार 707 लोकांना आपले नागरिकत्व सिध्द करता आलेले नाही.
- त्यामुळं हे 40 लाख लोक हे गेल्या काही वर्षात भारतात स्थायिक झालेले बांगलादेशी घुसखोर आहेत का असा प्रश्न निर्माण झालाय.
- विशेष म्हणजे यात भाजपाचे मोरीगावचे आमदार रमाकांत देवरी आणि एआईयुडीएफचे आमदार अनंतकुमार मल्लाह हे सुध्दा आपले नागरीकत्व सिध्द करु शकलेले नाहीत.
- धक्कादायक म्हणजे, जनगणनेनुसार गेल्या 50 वर्षात आसाममधली हिंदुंची लोकसंख्या 34 टक्क्यांवरुन 11 टक्के झाली असल्याचं स्पष्ट झालंय.
- या 40 लाख लोकांना घुसखोर ठरवून त्यांचा मतदानाचा हक्क काढून घेतला जाण्याचीही शक्यता आहे.
पुलवामामध्ये 40 जवान शहीद
पुलवामा येथे झालेल्या दहशतवाद्यांच्या आत्मघातकी हल्ल्यामध्ये 40 जवान शहीद झाले. शनिवारी सर्व जवानांचे पार्थिव त्यांच्या मुळगावी रवाना करण्यात आले. देशात सध्या दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्याबद्दल तीव्र संपात असून जोरदार निदर्शनं देखील करण्यात येत आहेत. या हल्ल्यामध्ये आसामच्या सुपुत्रांना देखील वीरमरण आलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.