नवी दिल्ली, 29 मार्च : महाराष्ट्रात आम्ही आणि शिवसेना एकत्र निवडणूक लढलो. फडणवीसांच्या नेतृत्वात निवडणूक लढलो. जर भाजप एकटी लढली असती तर पूर्ण बहूमत मिळालं असतं. पण शिवसेनेसोबत जुनी मैत्री होती, म्हणून त्यांच्यासोबत युती केली, असं वक्तव्य भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी केलं.
नेटवर्क 18 च्या वतीने रायझिंग इंडिया हा कार्यक्रम पार पडत आहे. या कार्यक्रमामध्ये केंद्रीय गृहमंत्री मंत्री अमित शहा यांची नेटवर्क 18 चे एडिटर इन चीफ राहुल जोशी यांनी प्रकट मुलाखत घेतली. या मुलाखतीमध्ये अमित शहा यांनी राजकीय घडामोडींवर परखड भाष्य केलं.
महाराष्ट्रात आम्ही आणि शिवसेना एकत्र निवडणूक लढलो. फडणवीसांच्या नेतृत्वात निवडणूक लढलो. यानंतर उद्धव मुख्यमंत्री बनले, पण जनतेत गेले तेव्हा त्यांच्यातील वैचारिक मतभेद दिसायला लागले. आमदार पळाले ते आमच्यामुळे नाही तर जनतेच्या दबावामुळे पळाले. खरी शिवसेना आमच्यासोबत एकत्र आली आहे. आगामी निवडणूक एकत्र लढवू आणि जिंकूही. आगामी निवडणुकीत 2024 मध्ये शिवसेनेसोबत जागावाटप चर्चा अजून झाली, पण एकत्रच लढणार, असंही अमित शहांनी स्पष्ट केलं.
(Rising India : काँग्रेसकडून तुम्हाला कधी ऑफर आली का? नितीन गडकरींनी एका वाक्यात दिले उत्तर)
सगळे कुठे एकत्र आले. मोदींचा विरोध करण्यासाठी सगळे एकत्र येत आहेत. पण पश्चिम बंगालमध्ये काय करणार? दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल जागा सोडणार का? असा सवालही शहांनी केला.
'कर्नाटकमध्ये पूर्ण बहुमत भाजपला मिळेल'
कर्नाटकमध्ये निवडणूक जाहीर झाली आहे. बोम्मई पुन्हा मुख्यमंत्री होतील का नाही, ते पार्टी ठरवेल. कर्नाटकच्या जनतेला डबल इंजिन सरकार हवं आहे. मोदींच्या योजनेला कर्नाटकमध्ये इंम्पलिमेंट करण्यासाठी तिकडेही भाजप सरकार गरजेचं आहे. कर्नाटकमध्ये भाजप पूर्ण बहुमतात येणार आहे, असंही शहा म्हणाले.
(केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची अशीही भारी आयडिया; युट्यूबवालेच देतात पैसे)
चंद्रशेखर राव, तृणमूल काँग्रेस, समाजवादी आणि काँग्रेस या चारही पक्ष मोदी विरुद्ध सगळे असे एकत्र आले तर, चंद्रशेखर राव यांची उत्तर प्रदेशमध्ये सभा ठेवली तर काय फरक पडेल? ममतांची सभा तेलंगणामध्ये ठेवली तर काय फरक पडेल? यादव साहेबांची सभा बंगालमध्ये ठेवली तर काय फरक पडेल? हे सगळे त्यांच्या त्यांच्या राज्यात आमच्याविरोधात लढत आहेत. एकता तुमचा टीआरपी वाढवण्यासाठी आहे. कोणीही एकमेकांना नेता मानत नाही आणि एकमेकांना सीट द्यायला तयार नाहीत. ममता, चंद्रशेखर राव आणि यादव यांनी एकमेकांना 5-5 सीट देऊन दाखवाव्या, असा टोलाही शहांनी लगावला.
सीबीआय-ईडी कारवाई
२०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीत भाजपने आश्वासन दिलं होतं, आमची लढाई भ्रष्टाचाराविरोधात आहे. २००४ ते २०१४ या काळात ईडीने ५ हजार कोटींची संपत्ती जप्त केली. मोदींच्या काळात १ लाख १० हजार कोटींची संपत्ती जप्त केली. यातले ५ टक्केही राजकारण्यांचे नाहीत. हे पैसे अधिकारी, भ्रष्ट व्यापाऱ्यांचे आहेत. ही लढाई बंद करायची का? असा सवालच शहांनी केला.
9 वर्षांत सीबीआयने भ्रष्टाचाराच्या ५ हजार केसेस टाकल्या, काँग्रेसने ५०० देखील टाकल्या नाहीत. या सगळ्या केस राजकारण्यांविरोधात नाही. लालूंविरोधात केस युपीएने केल्या होत्या. आणीबाणी लावून काँग्रेसने १९ महिने लोकांना जेलमध्ये टाकलं, त्यांना जामिनही मिळाला नाही. इकडे तर तुम्हाला जामीनही मिळतो, असंही शहा म्हणाले.
'मी गुजरातमध्ये गृहमंत्री होतो तेव्हा मोदींचं नाव घ्या तुम्हाला सोडून देतो, असं सीबीआयने सांगितलं. मोदींविरोधात एसआयटी बनवली. दंगलीची खोटी केस बनवली. मला अटक केली, ९० दिवसात मला सोडलं. राजकीय इशाऱ्यावर सीबीआयने केस केली, असं हायकोर्टाने सांगितलं. आम्ही काळे कपडे घातले नाहीत, असं म्हणत शहांनी काँग्रेसला आठवण करून दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Amit Shah