06 डिसेंबर: 25 वर्षांपूर्वी अयोध्येत आजच्या दिवशी म्हणजे 6 डिसेंबर 1992 साली बाबरी मशिदीचा घुमट पाडण्यात आला. वादग्रस्त वास्तू पाडली आणि हा दिवस आपल्या आनंदाचा दिवस असल्याचं मुख्यमंत्री कल्याण सिंह यांनी सांगितलं होतं. याच घटनेने देशाचं राजकारण बदललं.
6 डिसेंबर रोजी वादग्रस्त वास्तू पाडण्यात आली आणि केंद्र सरकारने कल्याण सिंह यांचं सरकार बरखास्त केलं. तर अयोध्या आंदोलनाला गती देणाऱ्या भाजपचे उत्तर प्रदेशात १५ वर्षांनंतर सरकार आलंय. त्या पार्श्वभूमीवर वादावर तोडगा दृष्टीक्षेपात येत आहे. याआधी अलाहबाद उच्च न्यायालयानं 2010मध्ये 2.77 एकर वादग्रस्त जमीनीचे तीन समान हिस्से करण्याचा निर्णय दिला आहे.
त्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात एकूण 13 अपीलं दाखल करण्यात आली आहेत. दरम्यान अयोध्येच्या मुद्द्यावर फेब्रुवारी 2018 पासून नियमित सुनावणी सुरू होणार असल्याचं सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केलं आहे. त्यात सुन्नी वक्फ बोर्डाची बाजू कपिल सिब्बल मांडत आहेत रामजन्मभूमीची बाजू मांडणाऱ्या वकीलांमध्ये हरीश साळवे यांचा समावेश आहे.
त्यामुळे रामजन्मभूमीचा मुद्द्यावर आतातरी तोडगा निघतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
6 डिसेंबर 1992 रोजी नेमकं काय घडलं?
- देशभरातून लाखोंच्या संख्येने कारसेवक अयोध्येत दाखल
- विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांचा समावेश
- सकाळी साडेदहा वाजता कारसेवकांनी बाबरी मशिदीला वेढा घातला आणि घुमटापर्यंत पोहोचले
- प्रत्येकाच्या मुखात त्यावेळी 'जय श्री राम'चा नारा
- कारसेवकांवर कुणीही गोळी चालवणार नाही, मुख्यमंत्री कल्याण सिंह यांचे आदेश
- अयोध्येत येणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले
- परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी 10 हजार पोलीस तैनात
- दुपारी 3 वाजून 40 मिनिटांनी पहिला घुमट तोडण्यात आला
- 4.55 वाजता संपूर्ण वादग्रस्त वास्तू जमीनदोस्त
- कारसेवकांनी त्याच जागी पूजा करून राम लालाची स्थापना केली