छत्तीसगड 04 एप्रिल : छत्तीसगडमधील बिजापूर येथे पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये (Naxalite) चकमक झाली आहे. या चकमकीत 5 जवानांना वीरमरण आलं आहे. तर, 21 जवान बेपत्ता (Jawans Missing After Encounter With Naxals) असल्याची माहिती नुकतीच समोर आली आहे. याशिवाय 30 जण जखमी झाल्याचं वृत्तही समोर आलं आहे. छत्तीसगड पोलिसांच्या सूत्रांनी याबद्दलची माहिती दिली आहे. बीजापूर जिल्ह्याच्या तर्रेम ठाणा क्षेत्रातील सिंगरेल आणि पुर्णिमाच्या दरम्यान ही चकमक झाली आहे.
या चकमकीत केवळ जवान शहीद झाले नाहीत. तर नक्षलवाद्यांना ठार करण्यातही यश आलं असल्याचं म्हटलं जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या चकमकीवेळी घटनास्थळी 200 हून अधिक नक्षलवादी उपस्थित होते. या घटनेत जखमी जवानांना बाहेर काढण्यासाठी दोन एमआय 17 हेलिकॉप्टर आणण्यात आले होते. दरम्यान वीरमरण आलेल्यांमध्ये 2 छत्तीसगड पोलीस, 2 कोब्राचे जवान (CRPF) आणि 1 सीआरपीएफच्या बस्तरिया बटालियनचा जवान आहे.
छत्तीसगड पोलिसांच्या सुत्रांच्या म्हणण्यानुसार, शनिवारी सुकमामध्ये झालेल्या या चकमकीत कमीत कमी 21 जवान बेपत्ता झाले आहेत. चकमकीत वीरमरण आलेल्या पाच जवानांपैकी दोघांचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आलं आहे. तर, जखमी झालेल्या जवानांमधील 23 जणांना बीजापूर तर 7 जणांना रायपूरमधील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सुरक्षा दलाचा असा दावा आहे, की या चकमकीत पंधराहून अधिक नक्षलवादी ठार झाले आहेत.
अमित शाह यांची प्रतिक्रिया -
या दुर्घटनेवर अमित शाह यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, की मी छत्तीसगडमध्ये माओवाद्यांसोबतच्या लढ्यात वीरमरण आलेल्या शूर जवानांना नमन करतो. देश त्यांचं हे योगदान कधीच विसरणार नाही. मी त्यांच्या कुटुंबीयांसाठी सहानुभूती व्यक्त करतो. आपण शांती आणि प्रगतीविरोधातील या शत्रुंसोबतची लढाई सुरूच ठेवू. जखमींच्या चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना करतो, असंही ते म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Naxal Attack