रांची 12 मार्च : आगीच्या एका घटनेनं तब्बल बारा लाखाचं नुकसान झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. ही घटना झारखंडच्या जमशेदपूर शहरामधील आहे. गोवुंदपूर ठाणा क्षेत्रातील फाटक रोडजवळ एटीएममध्ये भीषण आग (Fire Broke Out at ATM) लागली आणि पाहाता पाहाता संपूर्ण एटीएम या आगीच्या भक्षस्थानी आलं. हवा अधिक असल्यानं काही वेळातच एटीएम मशीन आगीत जळून खाक झालं. पोलीस आणि अग्निशमन दलाच्या हलगर्जीपणामुळे ही घटना घडली असल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे.
या घटनेची माहिती दिल्यानंतर बराच काळ लोटल्यावर पोलीस आणि अग्निशमन गाडी घटनास्थळी दाखल झाली. ते घटनास्थळावर पोहोचले तोपर्यंत बँक ऑफ इंडियाचं हे एटीएम आगीत जळून खाक झालं होतं. नंतर स्थानिक लोकांच्या मदतीनं आग नियंत्रणात आणण्यात आली. मात्र, या संपूर्ण प्रक्रियेला खूप उशीर झाला होता. मिळालेल्या माहितीनुसार, या आगीमध्ये एटीएममधील जवळपास १२ लाख रुपये जळून खाक झाले आहेत.
या घटनेनंतर स्थानिकांनी पोलीस आणि अग्निशमक दलाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे. लोकांच्या म्हणण्यानुसार, पोलीस आणि अग्निशमक दल वेळेत दाखल झाले असते, तर इतकं मोठं नुकसान टाळता आलं असतं. त्यांना झालेल्या दिरंगाईमुळे १२ लाख रुपयांचं नुकसान झालं. स्थानिक लोकांच्या मदतीनं या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं. अन्यथा ही आग वस्तीमध्ये आणि अनेक दुकानांमध्ये पसरुन मोठं नुकसान झालं असतं. आगीच्या कारण मात्र अद्याप स्पष्ट झालं नसून हा तपासाचा विषय आहे. मात्र, स्थानिक लोकांचं असं म्हणणं आहे, की ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.