नागपूर, 08 ऑगस्ट: मागील जवळपास तीन आठवड्यांपासून राज्यातून पाऊस (Rain in Maharashtra) गायब आहे. राज्यातील अनेक भागांत पावसाचं प्रमाण कमी झालं आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि खानदेशात पावसानं उघडीप घेतल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे. पण मागील जवळपास चार दिवसांपासून राज्यात पावसानं पूर्णपणे उघडीप घेतल्यानंतर, विदर्भात पावसाला पोषक हवामान तयार झालं आहे. पुढील दोन दिवस विदर्भातील बहुतांशी जिल्ह्यांत मेघगर्जनेसह चांगल्या पावसाची (Rain in Vidarbha) शक्यता हवामान खात्याकडून (IMD) वर्तवण्यात आली आहे.
पण इतरत्र राज्यात मात्र चालू आठवड्यात पावसाचं प्रमाण कमीच राहणार असून, पुढील आठवड्यात राज्यात मान्सूनची वापसी होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. जुलै महिन्यातील दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यात कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात ढगफुटीसदृष्य पाऊस झाल्यानंतर, राज्यात पावसाचा जोर कमी होत पूर्णपणे उघडीप घेतली आहे. यानंतर आता पुन्हा एकदा विदर्भात पावसाला पोषक हवामान तयार झालं आहे.
हेही वाचा-Covishield आणि Covaxin चा मिक्स डोस अधिक प्रभावी? काय सांगतो ICMR चा अभ्यास
आज नागपूर, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या सहा जिल्ह्यांना हवामान खात्यानं येलो अलर्ट (Yellow Alert) जारी केला आहे. याठिकाणी विजांच्या कडकडासह जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. दरम्यान 30 -40 किमी प्रतितास वेगानं वेगवान वारे वाहण्याची शक्यता आहे. उद्याही राज्यात हीच स्थिती कायम राहणार असून वरील सहा जिल्ह्यांना हवामान खात्यानं येलो अलर्ट जारी केला आहे.
हेही वाचा-GOOD NEWS! महाराष्ट्रातील हा जिल्हा झाला कोरोनामुक्त; एकही सक्रिय रुग्ण नाही
कोकणासह नद्यांच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या धो-धो पावसानं रत्नागिरी, रायगडसह, कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यात निर्माण झालेली पूर स्थिती आता ओसरली आहे. पण उत्तर मध्य महाराष्ट्रात अजूनही चांगल्या पावसाची प्रतिक्षा कायम आहे. हवामान विभागाने जाहीर केलेल्या दोन आठवड्यांच्या अंदाजानुसार चालू ६ ते १२ ऑगस्ट या कालावधीत राज्यात पावसाची दडी कायम राहणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Maharashtra, Vidarbha, Weather forecast