प्रदेशाध्यक्षपदी कोण? दिल्लीतून आलेल्या मोठ्या नेत्यासोबत काँग्रेसची महत्त्वाची बैठक
प्रदेशाध्यक्षपदी कोण? दिल्लीतून आलेल्या मोठ्या नेत्यासोबत काँग्रेसची महत्त्वाची बैठक
महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी एच.के. पाटील हे आज रात्री मुंबईत दाखल होणार आहे. त्यानंतर राज्यातील काँग्रेसचे प्रमुख नेते आणि पदाधिकाऱ्यांसोबत बैठक होणार आहे.
मुंबई, 05 जानेवारी : नवीन वर्षात काँग्रेसमध्ये (Congress) फेरबदल होणार अशी चर्चा रंगली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात (balasheb Thorat) हे आपल्या पदाचा राजीनामा देणार अते वृत्त आले होते. परंतु, थोरात यांनी राजीनामा देण्याचे वृत्त फेटाळून लावले आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी एच.के.पाटील हे मुंबईत येणार असून महत्त्वाची बैठक घेणार आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी एच.के. पाटील हे आज रात्री मुंबईत दाखल होणार आहे. त्यानंतर राज्यातील काँग्रेसचे प्रमुख नेते आणि पदाधिकाऱ्यांसोबत 8 वाजेच्या सुमारास बैठक घेणार आहे. या बैठकीमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्षपद आणि राज्यातील परिस्थितीबाबत चर्चा होणार अशी माहिती आहे.
दरम्यान, बाळासाहेब थोरात यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचे वृत्त फेटाळून लावले आहे. प्रदेशाध्यक्षपद हे आपल्याकडे राहणार आहे, तुर्तास काँग्रेसमध्ये कोणतेही बदल केले जाणार नाही, असं थोरात यांनी स्पष्ट केले आहे.
तर 'प्रदेशाध्यक्ष बदलाबाबत अधिकृत काही नाही. अजूनही अधिकृतरित्या काहीही सांगितलेलं नाही. प्रभारी एच. के. पाटील आज मुंबईत येत आहे. ते आल्यानंतर अजेंडा काय आहे ते समजेल. पण अद्याप याबाबत कुठलीही सूचना नाही', अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी दिली.
'आगामी जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका निवडणुका आहेत त्याबाबत पूर्वतयारीसाठी बैठक असावी असा माझा अंदाज आहे. बदलाच्या बाबतीत संकेत नाहीत. एका विशिष्ट परिस्थितीत बाळासाहेबांकडे जबाबदाऱ्या देण्यात आल्या. आपोआप जबाबदार्या येत गेल्या. त्यांच्याकडे तीन पदं दिली गेली असं नाही, त्या येत गेल्या. त्यांनीही बोलून दाखवलंय जबाबदार्या जास्त आहेत. बाळासाहेब थोरात हे ज्येष्ठ नेते आहेत, अनुभवी नेते आहेत, पदांना चांगला न्याय देत आहेत', असंही चव्हाण म्हणाले.
'शिवसेनेच्या भूमिकेवर मी काय सांगू शकतो. महाविकास आघाडी मजबूत व्हावी असं मला वाटतं. कालांतराने भूमिका बदलतात, अनुभवाने माणूस शिकतो, हा बदल स्वागतार्ह आहे', असंही चव्हाण म्हणाले.
'औरंगाबाद नामकरणाचा विषय हा माध्यमांनी उचललेला आहे. याबाबत मुख्यमंत्री कुठे बोलले आहेत का? सरकारमधून कुणी काही निर्णय घेतले का? माध्यमांनी अजेंडा सेट करायचा त्यावर प्रतिक्रिया घ्यायच्या. अजूनही हा विषय नाही. आम्हाला राज्यातील विकास कामांबाबत जास्त रस आहे. जिल्ह्यास्तर काही बोलत असतील तर तो विषय जिल्हास्तरावरचा आहे, राज्य स्तरावर हा विषय नाही', असंही चव्हाण म्हणाले.
'हल्ली सगळ्याचं गोष्टी ईडी आणि सीबीआय येत आहे. राज्याच्या सगळ्या गोष्टी ईडी, सीबीआयकडे जात असेल तर राज्याला स्वायत्तता आहे की नाही. राज्यामध्ये केंद्राचा हस्तक्षेप किती असावा, राजकीय हेतूने या गोष्टी घडत आहे. राज्याचे विषय रोज सीबीआय, ईडी होणार असेल तर हे योग्य नाही. भाजप सोडून सगळ्यांच्याच पक्षांना नोटीस येत आहे', अशी टीकाही चव्हाण यांनी केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.