मुंबई, 11 जून: मागील काही दिवसांपासून नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी (Monsoon Rains Update) चांगलाच वेग पकडला आहे. कालपर्यंत मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्राला (Monsoon in Maharashtra) व्यापून पुढे वाटचाल केली. दरम्यान मागील आठवड्यापासूनच राज्यातील बहुतांशी जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. मुंबईमध्ये मान्सूनने दिमाखात आगमन केलं, पण पहिल्याच पावसाने मुंबईकरांची पुरती तारांबळ उडवली आहे. आता तर पावसाचा जोर आणखी वाढणार आहे. रविवार आणि सोमवार (13, 14 जून) वेधशाळेने शहरात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.
आजपासून पुढील पाच दिवस मुंबईसह राज्यातील विविध जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. त्यातही येत्या रविवारी मुंबई, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांना हवामान खात्याने रेड अलर्ट जारी (Weather Red Alert issued for mumbai and thane) केला आहे.
त्यामुळे रविवारी मुंबई आणि ठाणेकरांना घरातचं बसावं लागणार आहे. सुट्टीचा दिवस असल्याने यादिवशी कुठे बाहेर सहलीसाठी जाण्याचा प्लॅन करत असाल, तर धोकादायक ठरू शकतो. कारण रविवारी मुंबईसह ठाण्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर न पडण्याचा आणि लांबचा प्रवास टाळण्याचा सल्ला हवामान तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे.
मागील तीन दिवसांपासून मुंबई आणि ठाणे परिसरात मुसळधार पाऊस कोसळत आहे. मान्सूनच्या पहिल्या पावसानेचं मुंबईकरांची पुरती तारांबळ केली आहे. मुंबईत मागील तीन दिवसांत विविध ठिकाणी जवळपास 140 ते 240 मिली पावसाची नोंद झाली आहे. एवढा पाऊस झाल्यानंतर मुंबईतील अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं. तर रस्ते तुडुंब वाहत होते.
हे ही वाचा- Weather Alert! महाराष्ट्राला मान्सूनने व्यापलं; 5 दिवस मुंबईसह या जिल्ह्यांत अतिमुसळधार पावसाचा इशारा
मुंबई शहर व उपनगरातील काही ठिकाणी ‘अतिवृष्टी’ होण्याची शक्यता असल्याचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील समुद्र किनारे व समुद्र किना-यांलगतचा परिसर इत्यादी ठिकाणी जाणे नागरिकांनी टाळावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन खात्याद्वारे करण्यात आले आहे. तसेच या अनुषंगाने सुनिश्चित कार्यपध्दतीनुसार खालीलप्रमाणे कार्यवाही करण्यात आली आहे.
भागीय नियंत्रण कक्ष व इतर सर्व नियंत्रण कक्षांना ‘High Alert’ देण्यात आला असून सर्व यंत्रणा सुसज्ज व सतर्क आहे.
नागरिकांचं सुरक्षेसाठी स्थलांतर
मिठी नदीच्या पातळीत वाढ होत असल्याचे निदर्शनास आल्यास क्रांतीनगर व इतर परिसरातील नागरिकांच्या तात्पुरत्या स्थलांतराची व्यवस्था करण्याच्या सूचना सहाय्यक आयुक्त, एल विभाग यांना देण्यात आली असून त्वरीत मदतीकरिता राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकाची एक तुकडी तेथे तैनात करण्यात आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.