मुंबई, 29 जून : महाराष्ट्राच्या विविध भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने पसरू लागला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात दरदिवशी 5 हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळून येत आहेत. अशातच आणखी एक गंभीर बाब समोर आली आहे. सरकारने कोरोनावरील ज्या औषधाबाबत महत्त्वपूर्ण घोषणा केली होती, त्याचा कच्चा माल 5 दिवसांपासून अडकून पडल्याचं स्पष्ट झालं आहे.
कोरोनावर औषध असलेल्या रेमडीसीवीर आणि फावीपिरावीर यांच्या निर्मितीसाठी आवश्यक असलेला कच्चा माल गेली पाच दिवस मुंबईच्या एअर कार्गोत अडकून पडला आहे. याबाबत CNBC-TV18 ने वृत्त प्रसारित केलं आहे. मायलन या फार्मास्युटिकल्स कंपनीकडून आयात करण्यात आलेला माल अडकूनच असल्याचं स्पष्ट झालं आहे. अनेक अभ्यासांती रेमडेसीवीर आणि फावीपिरावीर कोव्हिडचा मुकाबला करण्यात मदत करु शकतात हे समोर आले होतं.
महाराष्ट्रातील कोरोनाची स्थिती लक्षात घेत 25 जूनला राज्य सरकारने ही दोन्ही विषाणू विरोधी औषधं कोव्हिडवरील उपचारासाठी मागवून घेतली जातील असं म्हटलं होतं. भारतात हेट्रो ड्रग्ज आणि सिप्ला या दोन कंपनींना रेमडेसीवीर उत्पादित करण्याची आणि विकण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र या औषध निर्मितीसाठी आवश्यक असलेला कच्चा माल गेली पाच दिवस मुंबईच्या एअर कार्गोत अडकून पडल्याने आता ही औषधं बाजारात येण्यासाठी आणखी काळ लागू शकतो.
दरम्यान, राज्यात आज पुन्हा एकदा रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली असून 5257 नवे रुग्ण आढळले आहेत. तर 181 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे सध्या राज्यात 73298 अॅक्टिव केसेस असून आज 2385 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातून कोरोनाबाधितांची आजपर्यंतची एकूण 1 लाख 69 हजार 883 इतकी झाली आहे, तर एकूण मृत्यूंची संख्या 7610 वर पोहोचली आहे.
संपादन - अक्षय शितोळे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Mumbai news