27 नोव्हेंबर : विधान परिषद निवडणुकीत भाजपचे उमेदवार प्रसाद लाड यांना उमेदवारी जाहीर केलीये. शिवसेनेनंही प्रसाद लाड यांना पाठिंबा जाहीर केलाय. सेनेच्या पाठिंब्यामुळे प्रसाद लाड यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झालाय.
नारायण राणे आणि शिवसेनेतलं कटुत्व सर्वश्रूत आहे. त्यामुळे विधान परिषद निवडणुकीत नारायण राणे लढणार अशी चर्चा सुरू झाल्यानंतर शिवसेना काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. भाजपने शिवसेनेचा विरोध टाळण्यासाठी सर्व प्रकारची चाचपणी करून पाहिली. मागील आठवड्यात चंद्रकांत पाटील यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंशी चर्चाही केली. या चर्चेनंतर शनिवारपासून भाजपची कोअर कमिटीच्या बैठका पार पडल्यात. अखेर काल रविवारी झालेल्या बैठकीत प्रसाद लाड यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं.
सेनेच्या पाठिंब्यामुळे प्रसाद लाड यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झालाय. विधान परिषद निवडणूक जिंकण्यासाठी 145 मतांची गरज आहे. भाजपकडे मतांचा संख्या 122 आहे तर सेनेची संख्या 63 आहे. दोन्ही पक्षाची संख्या मिळून 185 झालीये. त्यामुळे लाड यांचा विजय निश्चित झालाय.
प्रसाद लाड 'मातोश्री'वर
रात्रीच प्रसाद लाड यांनी नाव निश्चित झाल्यानंतर मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या बैठकीत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे देखील उपस्थित होते.
आज प्रसाद लाड हे भाजप शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून सकाळी ११ वाजता उमेदवार अर्ज भरणार आहे. अर्ज भरते वेळी शिवसेनेचे आमदार ही उपस्थित राहणार आहे.
प्रसाद लाड यांच्या उमेदवारीला शिवसेनेचा पाठिंबा मिळाल्यामुळे नारायण राणे यांचा पत्ता कट झाल्याची ही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
विधानसभेत संख्याबळ
भाजप - 122
शिवसेना - 63
काँग्रेस - 42
राष्ट्रवादी- 41
इतर 20
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा