मुंबई, 18 जानेवारी : 'छत्रपती शिवाजी महाराज नसते तर पाकिस्तानच्या सीमा तुमच्या दारापर्यंत आल्या असत्या व बाळासाहेब ठाकरे नसते तर हिंदूंनाही नमाज पढावा लागला असता,' असं म्हणत आजच्या सामना या आपल्या मुखपत्राच्या अग्रलेखातून शिवसेनेनं शिवस्मारकाबाबत आपली भूमिका मांडली आहे.
अरबी समुद्रातील शिवस्मारकाचे काम सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा थांबवले आहे. त्यानंतर शिवसेनेनं आक्रमक होत स्मारकाविरोधात कोर्टात जाणाऱ्यांवर निशाणा साधला आहे. 'महाराष्ट्राच्या दैवतांबाबत कोर्टबाजी करून अडचणी निर्माण करण्याचे दुकान काही मंडळींनी उघडले. मग ते शिवस्मारक असो, नाही तर शिवसेनाप्रमुखांचे स्मारक. अशा स्मारकांची गरज काय? असे प्रश्न विचारले जातात तेव्हा आश्चर्य वाटते,' असं आजच्या सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.
'छत्रपती शिवाजी महाराज नसते तर पाकिस्तानच्या सीमा तुमच्या दारापर्यंत आल्या असत्या व बाळासाहेब ठाकरे नसते तर हिंदूंनाही नमाज पढावा लागला असता. ‘ऊठ मराठय़ा ऊठ’ ही अस्मितेची डरकाळी कधीच घुमली नसती.'
'वीर पुरुषांची स्मारके व्हायला हवी. त्यात राजकारण आणू नये. इंदू मिलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भव्य स्मारकही असेच रखडले आहे. छत्रपती शिवराय, डॉ. आंबेडकर व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ही तीन दैवते महाराष्ट्राची आहेत व राहतील, पण शिवराय सगळय़ांचे शिखर आहेत,' असंही शिवसेनेनं म्हटलं आहे.
VIDEO : 'बेस्ट कामगारांबाबत शिवसेना आता सूडबुद्धीने वागतेय'
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.