17 आॅगस्ट : मुंबईतील शिवाजीनगर परिसरात वीज चोरीच्या आरोपावरुन अटक करण्यात आलेल्या पाच आरोपींवर पोलिसांनी मोक्कांतर्गत गुन्हा दाखल केलाय. वीज चोरी करणारी 14 जणांची टोळी यात सक्रीय होती.
शिवाजीनगर परिसरात गेले अनेक दिवस वीज चोरीचा प्रकार सुरु होता. वीजपुरवठा करणाऱ्या फिडर पिलरमधून अनधिकृतपणे तिथल्या काही रहिवाशांना आणि छोट्या मोठ्या व्यवसायांना अतिशय कमी रकमेत वीजपुरवठा केला जात होता. ही वीजचोरी रोखण्यासाठी काही दिवसांपूर्वी परिसरात एलटी फिडर पिलर बसवण्यात आले. ज्यातून वीज चोरी करणं शक्य नसतं. पण या टोळीनं ते पिलर्सही तोडून टाकले.
या टोळीतील गुन्हेगार हे सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर मारामारी, जबरी चोरी खंडणी असे गुन्हे दाखल आहेत. आरोपी संघटीतपणे वीजचोरीचा गुन्हा करत होते, त्याच अनुषगांनं त्यांच्यावर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी अधिनियम म्हणजे मोक्कानुसार कारवाई करण्यात आलीये.
रिलायन्सच्या अधिकाऱ्यांकडे या टोळीनं दरमहा 50 हजारांची मागणी केली. आणि पिलर बसवू देणार नाही अशी भूमिका घेतली होती. त्यानंतर पोलीस संरक्षणात हे पिलर्स बसवण्यात आले. पण दुसऱ्याच दिवशी ते पिलर तोडून टाकण्यात आले होते. या वीज चोरीमुळे रिलायन्सचं कोट्यावधी रुपयांचा तोटा सहन करावा लागला.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा