मुंबई, 12 नोव्हेंबर : काहीही झालं तरी आम्ही सत्ता स्थापनेचा दावा करू असं ठाम मत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. तर युती तुटली का? या प्रश्नावर उद्धव ठाकरेंकडून बगल देण्यात आली आहे. भाजपसोबत जाणार का? किंवा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असणार यावर कोणतीही माहिती देण्यास उद्धव ठाकरेंनी घाई नाही. थोड्या वेळ थांबा अशी प्रतिक्रिया दिली आहे. द रिट्रीट या हॉटेलवर आमदारांची बैठक पार पडल्यानंतर शिवसेनेकडून आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
दरम्यान, आम्ही याआधी आघाडीला पाठिंबा देण्यासाठी फोन किंवा संपर्क केला नाही हे काँग्रेसने त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केलं. त्यामुळे भाजपचा आरोप खोटा असल्याचंही उद्धव ठाकरे म्हणाले. युती जर तुटली असेल तर ती भाजपनेच तोडली आणि भाजप हा पर्याय संपला असेल तर तो भाजपनेच संपवला असल्याचंही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं. युतीमध्ये अडीच वर्ष मुख्यमंत्री हा महत्त्वाचा मुद्दा होता. पण यावर भाजप खोटं बोलली आणि मला खोटं पाडलं. हे सगळं संतापजनक असल्याची प्रतिक्रियाही यानेळी उद्धव ठाकरेंनी दिली.
शिवसेनेच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे
- भाजप पक्षाच्या वेळेमध्येच राज्यपालांनी आम्हाला सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी वेळ दिली.
- भाजपने असमर्थता दाखवल्यानंतर आम्हाला निमंत्रण देण्यात आलं. पण भाजपच्या मुदतीतच शिवसेनेला निमंत्रण
- राज्यपालांना भेटलो सत्ता स्थापन करण्यासाठी तयारी असल्याचं सांगितलं. आकड्यांची जुळवा-जुळव करण्यासाठी आणि काँग्रेस-राष्ट्रवादीचा अधिकृत पाठिंबा मिळवण्यासाठी 48 तासांची वेळ मागितीली पण राज्यपालांनी वेळ नाकारली.
- राज्यपालांसारखी दयवान व्यक्ती आतापर्यंत कधीही पाहिली नाही
- 48 तासांची वेळ मागितली पण राज्यपाल इतके दयावान आहेत की थेट 6 महिन्यांची वेळ दिली
- शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी आम्ही चर्चा करू आणि सत्ता स्थापनेचा दावा करू
- काहीही झालं तरी शिवसेना सत्ता स्थापनेचा दावा करणार
- शिवसेना आणि भाजप एका विचारधारेचे पक्ष एकत्र आले. पण आता आम्ही काल आम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीला पाठिंब्यासाठी फोन केला. त्यामुळे वेगळ्या विचारांचे पक्ष एकत्र येण्यासाठी आम्ही विचार करू आणि सत्ता स्थापनेचा दावा करू
- भिन्न विचारधारेचे पक्ष आम्ही एकत्र कसे येऊ शकतो यावर चर्चा करू आणि सत्ता स्थापनेचा दावा करू
- भाजपसोबत अडीच वर्षाचं मुख्यमंत्री पद ही महत्त्वाची गोष्ट ठरवली होती. पण ते खोटं बोलले आणि मला खोटं पाडलं. हे संतापजनक आहे.
- चंद्रकांत पाटील यांनी आघाडीसोबत जाण्यावर शिवसेनेला शुभेच्छा दिल्याचं ऐकलं. चंद्राकांत पाटीलांनी शुभेच्छा देऊन दिशा दाखवली. मित्राने दिलेल्या शुभेच्छा पूर्ण करणार
- भाजपने संपर्क केला. पण संपर्क केल्यानंतर नवीन गोष्टी समोर येत असतील तर संपर्काला काही महत्त्व नाही
- अरविंद सावंत यांना धन्यवाद, ज्या मंत्रिमंडळात आपल्या पक्षाला चांगली वागणूक मिळत नाही ते सहन न झाल्याने त्यांनी पदाचा विचार न करता राजीनामा दिला.
- शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस मिळून नवीन सुरुवात करू शकतो. त्यासाठी तुम्ही सोबत येणार का? असं आघाडीला विचारण्यात आलं
- राष्ट्रपती राजवटीविरोधात आम्ही याचिका दाखल केली नाही. कारण राज्यपाल चुकीचा निर्णय घेणार नाहीत. अशा दयावान राज्यपालांमुळे देशाचं भलं होईल.
- सत्ता स्थापन करणं चेष्ठा नाही. आता आमच्याकडे खूप वेळ आहे. त्यामुळे आम्ही चर्चा करू आणि सत्ता स्थापनेचा दावा करू
- भाजपकडून संपर्काची उद्धव ठाकरेंकडून कबुली
- भाजपचा ऑप्शन भाजपनेच संपवला आहे. जर युती संपली असेल तर ती भाजपने संपवली
- आता काही दुरुस्त व्हायचं असेल तर बिघडायचं कशाला