मुंबई, 26 मे : 'भाजपनं (BJP) पनवती म्हणून नारायण राणेंना (Narayan Rane) अडगळीत टाकलेले आहे. त्यांना कावीळ झालेली आहे. ते अजून कोकणातही गेलेले नाहीत. भ्रष्टाचाराचा महामेरू म्हणून त्यांचा उल्लेख होतो' अशा शब्दांत शिवसेनेचे खासदार विनायक राऊत (Vinayak raut) यांनी टीका केली आहे.
तौक्ते चक्रीवादळाच्या मदतीवरून नारायण राणे यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडले होते. त्यांच्या या टीकेला विनायक राऊत यांनी जशास तसे उत्तर दिले. विनायक राऊत यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन भाजप आणि नारायण राणे यांच्यावर जोरदार हल्लाबोल चढवला.
'भ्रष्टाचाराचा महामेरू अशी राणेंची ओळख आहे. भाजपनं पनवती म्हणून नारायण राणेंना अडगळीत टाकलेले आहे. त्यांना कावीळ झालेली आहे. त्यामुळे त्यांना सगळीकडे एक सारखंच दिसत आहे. त्यांच्या रूग्णालयातच आरटीपीसीआरसाठी जादा पैसे घेतले जातात' असा गंभीर आरोप विनायक राऊत यांनी केला.
भूखंड हडप करणारा म्हणजे नारायण राणे. त्यांचा अनुभव हा भ्रष्टाचारातून आलेला आहे. स्वत:च्या घरात त्यांनी शांती घालावी. वर्षा व मातोश्री ही दैवतांची घरे आहेत' असा सल्लावजा टोलाही राऊत यांनी राणेंना लगावला.
'चिपी विमानतळाचा वाद विनाकारण उकरून काढला जात आहे. मुळात चिपी विमानतळ नारायण राणेंच्या कारकिर्दीत प्रायव्हेट ऑपरेटरला दिलेली आहे. केंद्र सरकारने परवानगी दिल्यास 15 दिवसांत विमानतळ सुरू होईल' असंही राऊत म्हणाले.
पदोन्नती आरक्षणावरून काही वाद निर्माण झाला आहे. काँग्रेसच्या नेत्यांनी आपली भूमिका मांडली आहे. पदोन्नतीचा प्रश्न वरिष्ठ नेते सोडवतील आणि त्यातून मार्ग निघेल. महाविकास आघाडी सरकार 5 वर्षे पूर्ण करेल. कुठलीही समस्या असली तरी त्यातून मार्ग काढला जाईल' असंही राऊत म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.