मुंबई, 12 जुलै : राज्यात काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीने एकत्र येऊन सरकार स्थापन केले. या महाविकास आघाडीचे शिल्पकार असलेले राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची पहिल्यांदाच सविस्तर अशी मुलाखत दैनिक सामनात प्रसिद्ध झाली आहे. सहा महिने हा सरकारच्या परीक्षेचा काळ असतो, यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पास झाले आहे का? या प्रश्नाला शरद पवारांनी आपल्या शैलीत उत्तर दिले.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शरद पवार यांची विशेष मुलाखत घेतली. पहिल्या भागानंतर आज दुसरा भाग प्रसिद्ध करण्यात आला आहे. शरद पवार यांनी मुलाखतीच्या दुसऱ्या भागात राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय प्रश्न व राष्ट्राच्या सुरक्षेच्या प्रश्नांवर मते मांडली.
यावेळी, सहा महिने हा परीक्षेचा काळ असतो. जसं पूर्वी वार्षिक परीक्षा, सहामाही परीक्षा असायच्या मग ते प्रगती पुस्तक येतं पालकांकडे. तसं या सरकारचं सहा महिन्यांचं प्रगती पुस्तक आपल्याकडे आलंय का? असा सवाल राऊतांनी पवारांना विचारला.
राजभवनावर कोरोनाचा कहर, 16 कर्मचारी आढळले पॉझिटिव्ह ; राज्यपाल झाले क्वारंटाइन
यावर शरद पवार म्हणाले की, 'बरोबर आहे. पण आता ही सहा महिन्यांची परीक्षा झालीय. परीक्षा संपूर्ण झाली असे मला वाटत नाही. परीक्षेतला प्रॅक्टिकलचा भाग अजूनही बाकी आहे.'
'तोच तर महत्त्वाचा आहे. आता कोठे लेखी परीक्षा झाली आहे, पण त्या परफॉर्मन्सवरून तरी प्रॅक्टिकलमध्ये सुद्धा हे सरकार यशस्वी होईल असा आता ट्रेंड दिसतोय. दुसरं महत्त्वाचं म्हणजे, अवघ्या सहा महिन्यांच्या कालखंडासंबंधी लगेचच निष्कर्ष काढणं योग्य नाही. शिवाय विद्यार्थी कष्ट घेताना दिसतोय. त्यामुळे निकालाची चिंता बाळगावी अशी स्थिती दिसत नाही. राज्याचा विचार करून तुम्ही विचारत असाल तर या सहा महिन्यांत परीक्षेत आमचा विद्यार्थी संपूर्ण पास झाला आहे. तो पुढची परीक्षा, पुढचे पेपरही सहजपणाने सोडवेल अशी खात्री आहे.' असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला.
आपण हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी सांगताय? असा सवाल पुन्हा राऊत यांनी उपस्थितीत केला असता पवार म्हणाले की, 'अर्थात मुख्यमंत्री ठाकरे यांच्याविषयीच मी हे बोलतोय. कारण शेवटी राज्यप्रमुख महत्त्वाचा असतो. त्याच्या नेतृत्वाखाली टीम काम करते. त्यामुळे त्याचे श्रेयसुद्धा त्यांनाच मिळणार.'
संजय राऊत - कोरोना संकट नसतं तर राज्य या सहा महिन्यांत आणखी पुढे नेलं असतं. तुम्ही याआधी हे राज्य चालवलेलं आहे. इतक्या वर्षांचा अनुभव आहे. आज राज्यासमोर सगळ्यात मोठं संकट कोणतं आहे?
शरद पवार – अर्थव्यवस्थेचं संकट आहे. ती रुळावर आणणं हे आव्हान आहे. हे मला फार मोठं चॅलेंज वाटतं.
संजय राऊत - कोरोनाचं संकट आणि अर्थव्यवस्थेची पडझड याचा परिणाम आपल्याला काय दिसतोय?
कोरोनाची सौम्य लक्षणं असूनही अमिताभ बच्चन यांना का केलं रुग्णालयात दाखल?
शरद पवार – 'शेतीच्या अर्थव्यवस्थेचा विचार करा. खासकरून शेती आणि त्याचं उत्पादन. शेतीशी संबंधित बाकीचे व्यवहार चालू आहेत, चालू नाहीत असं नाही, पण त्याला मार्केट नाही. मार्केट नसल्यामुळे सुरुवातीचे काही दिवस शेतकऱयांनी पिकवलेल्या पिकाचं पुढे जाऊन करायचं काय? हा प्रश्न शेतकऱयांपुढे आला. नंतर त्या मालाच्या किमतीचे प्रश्न आले. त्यामुळे संपूर्ण शेती, अर्थव्यवस्था संकटात आली. दुधासारखे जे शेतीचे जोडधंदे आहेत. त्याचा सप्लाय बंद झाल्यासारखी स्थिती होती. साधने नव्हती, या सगळय़ा गोष्टींचा राज्याच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होत होता.'
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: NCP, Sanjay raut, Sharad pawar, Sharad pawar interview, Shivsena, Uddhav Thackery