मुंबई, 10 जून : 'जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी सत्ता ही महत्त्वाची असते, पण सत्ता ही एकाच ठिकाणी राहिली तर ती भ्रष्ट होत असते. त्यामुळे सत्ता ही अनेक लोकांच्या हातात गेली पाहिजे', असा महत्त्वाचा सल्ला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी महाविकास आघाडी सरकारला (MVA Goverment) दिला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज 22 वा वर्धापन दिन ( 22nd anniversary of the Nationalist Congress Party) आहे. या निमित्ताने बोलत असताना शरद पवार यांनी शिवसेनेचं भरभरून कौतुक केलं तसेच सत्तेचा कानमंत्र सुद्धा दिला.
'आज आपण वेगळ्या विचारांच्या पक्षांना एकत्र येऊन सरकार स्थापन केले. सरकार स्थापन केल्यानंतर अनेक वेळा भाजप नेत्यांनी इतक्या दिवस सरकार टिकेल, तितक्या दिवस सरकार टिकेल अशी विधान करत आहे. पण मी त्याकडे लक्ष देत नाही. महत्त्वाचे प्रश्न आहे, आपल्याला त्यात लक्ष घालावे लागणार आहे. आज कोरोनाची परिस्थिती आहे त्यातून बाहेर पडण्याचे काम करावे लागणार आहे' असं शरद पवार म्हणाले.
तसंच, 'मराठा आरक्षण असेल, स्थानिक स्वराज संस्थेत ओबीसीचा प्रश्न असेल हे आपल्याला सोडवावेच लागणार आहे. सत्ता ही अनेक हातांमध्ये गेली पाहिजे. सत्ता एकाच ठिकाणी राहिली तर भ्रष्ट होत असते. जर सत्ता भ्रष्ट होऊ द्यायची नसेल तर ती अधिक लोकांच्या हातामध्ये गेली पाहिजे. अधिक लोकांच्या हातात गेली पाहिजे, हे सूत्र आपल्याला मांडायचे आहे. एससी, एसटी,ओबीसी घटकाला आपण सत्तेचे वाटेकरी आहोत, याची जाणीव झाली पाहिजे. हे आपण जेव्हा करू तेव्हा अधिक लोकांचा पाठिंबा आपल्याला मिळल्या शिवाय राहणार नाही, असा सल्ला शरद पवारांनी दिला.
शिवसेना विश्वास ठेवणारा पक्ष
'मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिष्टमंडळाने पंतप्रधानांची भेट घेतली. त्यानंतर एकांतात मोदींनी उद्धव ठाकरेंशी चर्चा केली, असं माझ्या वाचण्यात आलं. त्यानंतर अनेक जण तर्कवितर्क लढवत आहे. पण, शिवसेनेसोबत आपण काम कधी केलं नाही. महाराष्ट्र शिवसेनेला खूप वर्षांपासून पाहत आहे. माझा पूर्वीचा अनुभवानुसार, हा विश्वासाचा पक्ष आहे' असं शरद पवार म्हणाले.
'जेव्हा जनता पक्षाचे सरकार आले होते. तेव्हा काँग्रेसचा पराभव झाला होता. अशा परिस्थितीत काँग्रेसला पाठिंबा देण्यासाठी शिवसेना हा पक्ष पुढे आला होता. तो नुसता पुढे आला नाहीतर धोरणात्मक निर्णय घेत इंदिरा गांधी यांना मदत करण्यासाठी एक सुद्धा उमेदवार उभा केला नव्हता. विधानसभा निवडणुकीत एखादा पक्ष उमेदवारच उभा करणार नाही, यापेक्षा मोठा निर्णय काय असू शकतो. त्याची चिंता बाळासाहेबांनी कधी केला नाही. इंदिरा गांधी यांना शब्द दिला होता तो बाळासाहेबांनी पाळला. हा इतिहास काही विसरता येणार नाही. त्यामुळे कुणी काहीही शंका घेत असतील तर शिवसेनेनं त्या कालखंडात भूमिका घेतली होती ते पाहता, काही जण काहीही आखाडे बांधत असतील तर ते वेगळ्या वळणाचे आहे, हे सरकार पाच वर्ष टिकेल', असं पवारांनी ठणकावून सांगितलं.
तुमच्याकडे आहे हे 2 रुपयाचं नाणं तर घरबसल्या कमवा 5 लाख रुपये, वाचा काय आहे ऑफर
'तुमच्या मागे जो सामान्य माणूस आहे. त्याच्याशी बांधिलकी जपा. आपले अनेक सहकारी सोडून गेले, पण तरीही राष्ट्रवादीने आपली सत्ता स्थापन केली आणि राज्यात नेतृत्व करण्याची फळी निर्माण केली. राजकारण सांभाळण्याचे काम राष्ट्रवादीने केले आहे. सत्ताही महत्त्वाची आहे. लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सत्ताही महत्त्वाची आहे, असंही पवार म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ajit pawar, NCP, Sharad pawar, राष्ट्रवादी, शरद पवार