मुंबई 7 नोव्हेंबर: विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठीची योग्य ती खबरदारी घेऊन राज्यातील नववी ते बारावी पर्यंतच्या शाळा (Schools reopening in maharashtra) सुरू करण्यात याव्या असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी शनिवारी दिले. व्हिडीयो कॉन्फरंसिंग द्वारे आयोजित बैठकीत ते बोलत होते. या वेळी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, राज्यमंत्री बच्चू कडू, अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा उपस्थित होते. मुख्यमंत्री पुढे म्हणाले, जागतिक परिस्थिती बघतां, कोरोनाची दुसरी लाट (second Corona wave ) येण्याची शक्यता नाकारतां येत नाही. दिवाळी नंतर पुढचे काही दिवस अधिक सतर्क राहण्याची आवश्यकता आहे.
ज्या शाळांमध्ये क्वारंटाईन सेंटर्स तयार करण्यात आले होते, ते सेंटर्स बंद करता येणार नाहीत. अशा ठिकाणच्या शाळा पर्यायी जागेत सुरू करता येतील का त्याबाबत स्थानिक प्रशासनाने निर्णय घ्यावा.
शाळांचे सॅनिटायजेशन, शिक्षकांची कोरोना तपासणी या सारख्या सर्व बाबींची काळजी घेणे आवश्यक आहे. जे मुल आजारी आहे, किंवा ज्या घरातील व्यक्ती आजारी आहे अशा पाल्यांना पालकांनी शाळेत पाठवू नये असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.
सर्व शिक्षकांची RTPCR चाचणी होणार
शाळा सुरू होण्यापूर्वी सर्व शिक्षकांची RTPCR चाचणी ही 17 ते 22 नोव्हेंबर या दरम्यान स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून करून घेतली जाईल, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी यावेळी दिली. 23 नोव्हेंबर पासून सुरू होणाऱ्या शाळांमधे विद्यार्थ्यांचे थर्मल चेकींग करण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं.
ना लस ना औषध, आता 'या' Antibodies कोरोनाचा कायमचा खात्मा करणार
एका विद्यार्थ्यांला एका बेंचवर बसविण्यात येईल, एक दिवसाआड वर्ग भरतील, विद्यार्थ्यांनी घरून जेवण करून यावे, स्वत:ची पाण्याची बाटली सोबत आणावी. चार तासांची शाळा राहील त्यात केवळ विज्ञान, गणित आणि इंग्रजी असे कठिण विषय शिकवले जातील. या विषयांसह बाकी विषयांसाठी ऑनलाईन वर्गांची सुविधा असेल असेही त्यांनी स्पष्ट केले.
अलर्ट! कोरोना विषाणुंच्या लक्षणांमध्ये बदल; या देशात 1.7 कोटी उंदीर मारणार
शाळा सुरू करतांना टप्प्या टप्प्याने शाळा सुरू कराव्या तसेच शाळा व्यवस्थित सुरू रहाव्या यासाठी स्थानिक प्रशासनाला योग्य त्या सूचना देण्याची विनंती राज्यमंत्री बच्चू कडू यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांना केली.
शाळा सुरू करण्यासंदर्भातील सविस्तर एस ओ पी तयार करण्यात आली असून स्थानिक प्रशासनाच्या सहकार्याने टप्प्या टप्प्यांने शाळा सुरू करण्यात येतील असे अप्पर मुख्य सचिव कृष्णा यांनी सांगितले.