सागर कुलकर्णी, मुंबई, 6 मार्च : राज ठाकरे यांची मनसे महाआघाडीत सामील होण्याची शक्यता आता जवळपास मावळली आहे. त्यामुळे ईशान्य मुंबईतील जागा राष्ट्रवादीच लढवणार हे आता निश्चित झालं आहे. या मतदारसंघातून संजय दीना पाटील हे राष्ट्रवादीचे उमेदवार असतील, अशी माहिती आहे.
राज ठाकरे हे आगामी लोकसभा निवडणुकीत महाआघाडीत जातील, अशी जोरदार चर्चा होती. तसंच राष्ट्रवादी आपल्या कोट्यातून ईशान्य मुंबईची जागा मनसेला सोडेल, असंही बोललं जात होतं. मात्र मनसे महाआघाडीत सामील होणार नाही, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी केलं. त्यानंतर मग राज ठाकरे हे या निवडणुकीत 'एकला चलो रे'ची भूमिका घेण्याची शक्यता आहे.
शरद पवार व्हिडिओ कॉन्फरंसिंगद्वारे साधणार संवाद
ईशान्य मुंबईतील बूथ अध्यक्षांबरोबर शरद पवार संवाद साधणार आहेत. या लोकसभा मतदारसंघातील पक्षाच्या तयारीचा आढावा यावेळी शरद पवार आपल्या कार्यकर्त्यांकडून घेतील.
दरम्यान, राज ठाकरेंनंतर आता प्रकाश आंबेडकर हेदेखील आघाडीपासून दूर होताना दिसत आहे.प्रकाश आंबेडकर यांची काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडीची चर्चा ट्रॅकवर येत नसल्याचं चित्र आहे. त्यानंतर आता वंचित बहुजन आघाडीतच उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून आता एमआयएमच्या इम्तियाज जलील यांची उमेदवारी पुढे येत आहे.
प्रकाश आंबेडकर यांचा योग्य सन्मान काँग्रेस राष्ट्रवादी केला तर एमआयएम बाजूला राहील असं ठरलं होतं. मात्र प्रकाश आंबेडकर आणि काँगेस राष्ट्रवादीमध्ये जागावाटपाबाबत जमत नाही. त्यामुळे आता वेगळी गणित मांडली जात आहेत. एमआयएमतर्फे इम्तियाज जलील यांना उमेदवारी देण्याची मागणी करण्यात येत आहे.
VIDEO : देव तारी त्याला कोण मारी! चिमुकला दुसऱ्या मजल्यावरून खाली पडला, अन्...