मुंबई 26 ऑक्टोबर: भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी सावरगाव इथल्या भगवान भक्ती गडावर घेतलेल्या मेळाव्यामुळे पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. त्यामुळे पंकजा मुंडे यांनी संताप व्यक्त केला आहे. त्या म्हणाल्या, परवानगी घेऊन गेले असतानाही गुन्हा दाखल झाला आहे. आधी माझ्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले आता तेच सत्र माझ्यापर्यंत आलं आहे असा संताप त्यांनी व्यक्त केला.
त्या म्हणाल्या, मी अतिवृष्टीची पाहणी केली, शेतकऱ्यांचे अश्रू पुसले, अनेक नेते दौऱ्यात अनेक जिल्ह्यात होते. परवानगी घेऊन दसऱ्याला भगवान बाबांच्या दर्शनासाठी गेले असतां गुन्हा दाखल झाल्याची बातमी पहिली. कार्यकर्त्यांच्या नंतर हे गुन्हे दाखल करण्याचं सत्र माझ्यापर्यंत आलं आहे.
अमळनेर पोलीस स्टेशनमध्ये पंकजा मुंडे यांच्यासह महादेव जानकर, भागवत कराड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंकजा यांच्यासह उभय नेत्यांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्याचं उल्लंघन केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. भादंवि 188, 269, 270 सह कलम 51(ब) आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार पंकजा मुंडे, खासदार भागवत कराड, महादेव जानकर, आमदार मोनिका राजुरे, आमदार मेघना बोर्डीकर, भीमराव धोंडे, सविता गोल्हार, विजय गोल्हार, सुवर्णा लांबरुड, संदेश सानप, राजेंद्र सानप, राजाभाऊ मुंडे आणि इतर 40 ते 50 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मेळाव्यात काय म्हणाल्या पंकजा मुंडे?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पंकजा भाऊ मानतात. ठाकरे आणि मुंडे परिवाराचे अनेक वर्षांचे ऋणानुबंध आहेत. मात्र, एकनाथ खडसे यांनी भाजप सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर पंकजा यांनी यावेळी बोलणं टाळलं. शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर व मंत्री गुलाबराव पाटील यांनी पंकजा यांना थेट पक्षप्रवेशाची ऑफर दिली होती. त्यावर पंकजा यांनी आज कोणतंही भाष्य केलं नाही.
अतिवृष्टी पाहणी केली, शेतकऱ्यांचे अश्रू पुसले, अनेक नेते दौऱ्यात अनेक जिल्ह्यात होते. परवानगी घेऊन दसऱ्याला भगवान बाबांच्या दर्शनासाठी गेले असता गुन्हा दाखल झाल्याची बातमी पहिली.. कार्यकर्त्यांच्या नंतर हे गुन्हे दाखल करण्याचं सत्र माझ्यापर्यंत आलं तर..
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) October 26, 2020
मात्र, काही सूचक वक्तव्ये केली. शिवसेनेचा दसरा मेळावा आणि शिवाजी पार्क (शिवतीर्थ) अशी ऐतिहासिक परंपरा आहे. या मेळाव्यासाठी मुख्यमंत्री व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पंकजा यांनी शुभेच्छा दिल्या. त्याचवेळी शिवाजी पार्कवर शक्तिप्रदर्शनाची इच्छा आपल्या कार्यकर्त्यांपुढे त्यांनी ठेवली. मला एकदा मुंबईतलं शिवाजी पार्क भरून दाखवायचं आहे, असे त्या म्हणाल्या.