मुंबई, 21 एप्रिल : पालघरमध्ये जमावाकडून दोन साधू आणि चालकाच्या हत्या प्रकरणामुळे देशातील राजकारण ढवळून निघाले. या प्रकरणी 101 आरोपींना अटकही करण्यात आली आहे. या प्रकरणावरून विरोधकांनी राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. आज शिवसेनेनं आपले मुखपत्र असलेल्या सामनातून भाजपवर सडकून टीका केली आहे.
पालघरमधील ज्या गडचिंचले गावात ही दुर्घटना घडली ते गाव व ग्रामपंचायत गेली दहा वर्षे पूर्णपणे भाजपच्या ताब्यात आहे. सरपंच भाजपचाच आहे. म्हणजे मारहाण करणार्यायांचा रंग कोणता, हे सांगायला नको, असं म्हणत शिवसेनेनं थेट भाजपवर हल्लाबोल केला आहे.
मग तेव्हा बाळासाहेबांचा महाराष्ट्र नव्हता का?
'हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या राज्यात हिंदू साधूंची हत्या होते यावर काहींनी चिंता व्यक्त केली आहे. या चिंतेमागचे खरे कारण वेगळेच आहे. विरोधी पक्षनेत्यांनीही समाज माध्यमांवर या घटनेवरून अश्रूंचा पूर वाहिला आहे. पण याआधी त्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात धुळय़ात पाच आणि चंद्रपुरात एका हिंदू गोसाव्याची जमावाने अशीच निर्घृण हत्या केली होती. तेव्हा हा हिंदुहृदयसम्राटांचा महाराष्ट्र नव्हता काय?' असा थेट सवाल विचारण्यात आला आहे.
हेही वाचा - पालघर मॉब लिंचिंगः साधुंच्या हत्येवर RSS नाराज, ट्विटरवर दिली पहिली प्रतिक्रिया
गोमांस भक्षणप्रकरणांतून हत्येचं काय?
'गोमांस भक्षणप्रकरणी दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेशात सतत मॉब लिंचिंग झाले, पण मरणारे मुसलमान होते म्हणून बेगडी हिंदुत्ववादी उन्मादाने नाचत होते. हत्या कोणाचीही असो, ती वाईटच. एखाद्याच्या हत्येने जो आनंद व्यक्त करतो ती एक विकृतीच मानावी लागेल. मग आपल्यात व ओसामा बिन लादेन, मसूद अझहर वगैरे निर्घृण लोकांमध्ये फरक काय? मॉब लिंचिंग एक विकृती आहे व या विकृतीचे समर्थन कोणालाही करता येणार नाही. पालघरच्या घटनेनंतर एका विशिष्ट विचारांचे तसेच संस्था आणि संघटनेशी संबंधित लोक बोलू आणि लिहू लागले आहेत. हेसुद्धा खतरनाक आहेत' अशी चिंताही सेनेनं व्यक्त केली.
हिंदू-मुसलमान असा रंग देण्याचा प्रयत्न
पालघरजवळ झालेल्या दोन साधूंच्या हत्येने महाराष्ट्राच्या परंपरेस हादरा बसला हे खरे. असा हादरा बसावा म्हणून कोणी हे सर्व घडवले नाही ना? महाराष्ट्रात साधूंची भगवी वस्त्र रक्ताने भिजली याचे राजकारण कोणी करू नये, हा सर्व प्रकार म्हणजे महाराष्ट्राला बदनाम करण्याचा प्रकार आहे हे आता उघड होऊ लागले आहे. कारण काही मंडळींनी यासही हिंदू-मुसलमान असा रंग देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे, साधूंवर हल्ला करणारे जितके नराधम आहेत तितकेच नराधम या प्रकरणास जातीय आणि धार्मिक रंग देणारे आहेत, अशी टीकाही सेनेनं केली.
हेही वाचा - पालघरमध्ये साधूंच्या हत्येच्या वेळी नेमकं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीचा VIDEO
उत्तरप्रदेशमध्येही हिंदू महासभा अध्यक्षांची हत्या
'आजही महाराष्ट्राचा ग्रामीण भाग अज्ञान, अंधश्रद्धा आणि अफवांच्या जाळय़ात अडकला आहे. त्यातूनच चंद्रपूर, धुळे आणि डहाणू-पालघरसारख्या घटना घडत आहेत. महाराष्ट्रात साधूंची भगवी वस्त्र रक्ताने भिजली याचे राजकारण कोणी करू नये. उत्तर प्रदेशसारख्या राज्यात हिंदू महासभा अध्यक्षाची अलीकडेच गोळय़ा घालून हत्या करण्यात आली. त्यांच्या अंगावरही भगवेच कपडे होते', अशी आठवणही सेनेनं करून दिली.
संपादन - सचिन साळवे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.