मुंबई, 2 एप्रिल : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागरिकांशी संवाद साधल्यानंतर विरोधकांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल करण्यास सुरुवात केली आहे. मुख्यमंत्र्यांनी आज आपल्या भाषणात मांडलेल्या अनेक मुद्द्यांवरुन पक्षांनी नाराजी वर्तवली आहे. माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणानंतर तीव्र टीका केली आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करीत आपली नाराजी व्यक्त केली. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं की, बेल्जियमने परत लॉकडाऊन केलाय... पण, 20 बिलियन युरोचे पॅकेज जाहीर केलंय... पोर्तुगाल सरकारने नागरिकांची ये-जा थांबविली आहे... पण, 13 बिलियन युरोचे पॅकेज मार्च 2020 मध्येच जाहीर केलं आहे.
होय, आम्ही तर गेल्या वर्षभरापासून रस्त्यावरच आहोत... आणि आमची पुन्हा तयारी आहे, रस्त्यावर उतरून पुन्हा लोकांना समजून सांगण्याची, त्यांच्या मदतीला धावून जाण्याची...#CoronaInMaharashtra @CMOMaharashtra
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) April 2, 2021
युके,जर्मनी कुठेही जा,सर्वांनीच काही ना काही दिलंय... तुलना केवळ परिस्थितीशी नको,सरकारच्या कृतीशीही व्हावी,एवढीच महाराष्ट्राच्या जनतेची अपेक्षा! विरोधक वा तज्ञांचा दु:स्वास करून नाही,तर आपण प्रत्यक्ष काय करतो,याचे प्रबोधनात्मक विवेचन कोरोना थांबविण्यात अधिक मदत करेल.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) April 2, 2021
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी एक व्हिडिओ शेअर करीत आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी वाढत्या कोरोनाच्या बाबतीत ठोस उपाययोजना सांगण्याऐवजी पुन्हा एकदा 'प्रबोधनात्मक' संवाद साधला. एका बाजूला इतर राज्याचं मला सांगू नका असं बोलत असताना जगभराची आकडेवारी देण्यामागील प्रयोजन कळलं नाही.
दरेकरांची मांडलं मत..
-आरोग्य सुविधा वाढवल्या असं मुख्यमंत्री सांगत असतील तर मग अनेक ठिकाणी रुग्णांना बेड्स का मिळत नाहीत, व्हेंटिलेटर्स, औषधं का मिळत नाहीत, कोरोना रुग्णाला ऑक्सिजन सिलिंडर घेऊन रुग्णालयाबाहेर का उभं राहावं लागतं व त्यात त्याचा मृत्यू का होतो, याच उत्तर दुर्दैवाने या संवादातून मिळालं नाही.
-मुख्यमंत्री जनतेलाच प्रश्न विचारतात की डॉक्टर कुठून आणणार, नर्सेस कुठून आणणार. परंतु जे कार्यरत आहेत त्यांची काळजी सरकारकडून घेतली जात नाही, त्यांचे पगार वेळेत दिले जात नाहीत.
-मुख्यमंत्र्यांचा संवाद सुरू असताना कृष्णा चव्हाण नावाच्या डॉक्टरने फोनवरून कोरोनात काम करण्याची इच्छा असताना नवी मुंबईत अपॉइंटमेंट दिली जात नाही, अशी माहिती दिली. म्हणजे, केवळ बोलणं आणि कृतीतील हा विरोधाभास दिसून येतो
-मुख्यमंत्री यांनी निर्णय घ्यायचे असतात, पण तेच रुग्णवाढ कशी थांबवायची, असा प्रश्न जनतेला विचारत आहेत. अशा प्रकारे ही सर्व वक्तव्य हताशपणाची वाटली. -नियोजन, समन्वय आणि नियंत्रण करण्याचे काम मुख्यमंत्र्यांचे असते. त्या ऐवजी त्यांनी माहिती सादर करण्याचे काम केले आहे.
-केंद्राच्या माध्यमातून जी मदत पाहिजे ती केंद्र सरकार करेलच.
-जीविताशी खेळू नका, राजकारण करू नका, असा सल्ला त्यांनी दिला. परंतु, भरमसाठ रुग्णवाढ होत असताना, मृत्यू होत असताना, नियोजनाचा अभाव असताना विरोधी पक्षाने बोलायचे नाही, अशी अपेक्षा असेल तर ते होणार नाही. कारण, जबाबदारी जर सरकारकडून पार पाडली जात नसेल तर विरोधी पक्षाची जबाबदारी आम्ही पार पाडत राहू.
वाढत्या रुग्ण संख्येमुळे आरोग्य सेवक कमी पडत आहेत त्यामुळे सरकारने मागील अनेक वर्षात निवृत्त झालेल्या आरोग्य सेवकांना सेवे साठी रुजू करून घ्यावे. यामुळे अनुभवी आरोग्य सेवक भेटतील व त्याचा कोरोना विरुद्ध लढ्यात नक्कीच फायदा होईल.@CMOMaharashtra ,@rajeshtope11
— Bala Nandgaonkar (@BalaNandgaonkar) April 2, 2021
येत्या काळात रुग्णसंख्या वाढत राहिली तर आरोग्य सेवेवर अतिरिक्त ताण निर्माण होऊन आरोग्य सेवक कमी पडतील, अशी भीती मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात व्यक्त केली होती. त्यावर बाळा नांदगावकरांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.