मुंबई, 04 जून : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 10 जून हा वर्धापन दिन दरवर्षी उत्साहाने साजरा होतो, मात्र कोरोना संकटामुळे यंदा सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन करू नये. त्याऐवजी सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम पाळून रक्तदान शिबिरांचे राज्यभर आयोजन करण्यात यावं, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, जलसंपदामंत्री जयंत पाटील आणि यांनी पक्षाचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष येत्या 10 जून रोजी 21 वा वर्धापन दिन साजरा करत आहे. कोरोना संकटामुळे हा वर्धापन दिन सार्वजनिकरित्या व मोठ्या प्रमाणावर साजरा करता येणार नसला तरी वर्धापन दिनाच्या निमित्ताने आपली सामाजिक बांधिलकी पार पाडण्याची गरज आहे.
हेही वाचा -राज्यसभा निवडणुकीआधी काँग्रेसला भगदाड, भाजपची ताकद वाढणार?
'कोरोना रुग्णांना रक्ताची गरज पडत नाही. परंतु, राज्यात मोठ्या संख्येने असलेल्या थॅलेसेमिया आणि अन्य रुग्णांना वेळोवेळी रक्ताची गरज भासते. ही गरज पूर्ण करण्यासाठी पक्षाच्या लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह नागरिकांनी पुढे यावे, स्वत: रक्तदान करावे, इतरांनाही रक्तदानासाठी प्रवृत्त करावे आणि रक्त संकलनाच्या कार्यास हातभार लावावा', असं आवाहन अजित पवार आणि जयंत पाटील यांनी केले आहे.
हेही वाचा -मोठी बातमी, काँग्रेसच्या कॅबिनेट मंत्र्याने केली कोरोनावर मात
राज्यावरील कोरोनाचे संकट आणि गेल्या अडीच महिन्यांच्या लॉकडाउनच्या काळात पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी विविध समाजोपयोगी उपक्रमांद्वारे केलेल्या जनसेवेबद्दल या दोन्ही नेत्यांनी कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले असून आभार मानले आहेत.
समाजातील दुर्बल, वंचित घटकांना, तसंच अडचणीत असलेल्या बांधवांना पक्षीय व वैयक्तिक पातळीवर मदत करण्याची परंपरा यापुढेही कायम ठेवावी, असंही दोन्ही नेत्यांनी आपल्या संयुक्त आवाहनात म्हटलं आहे.
संपादन - सचिन साळवे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.