मुंबई, 14 जानेवारी : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते तसंच मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि नवाब मलिक (Nawab Malik) त्यांच्यावर होत असलेल्या आरोपांमुळे अडचणीत सापडले आहेत. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या दोघांच्या राजीनाम्याची गरज नाही, असं स्पष्ट केलं आहे. याबाबतची पत्रकार परिषद राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी घेतली. पण या पत्रकार परिषदेनंतर लगेचच जयंत पाटील, अजित पवार (Ajit Pawar) आणि प्रफुल्ल पटेल (Prafull Patel) यांच्यामध्ये बैठक सुरू झाली आहे. तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे मुंबईतच आहेत.
मंत्रिमंडळामध्ये फेरबदल करण्याची गरज नाही, वरिष्ठ नेते याबाबत निर्णय घेतील, असंही जयंत पाटील यांनी सांगितलं.
काय आहे वाद?
धनंजय मुंडे यांनी आपले विवाहबाह्य संबध असून यातून आपल्याला दोन मुलं झाली आहेत, याची कबुली दिली, तसंच त्यांच्यावर बलात्काराचा आरोपही करण्यात आला आहे. निवडणुकीसाठी भरलेल्या प्रतिज्ञापत्रात धनंजय मुंडे यांनी या दोन मुलांचा उल्लेख केलेला नाही, त्यामुळे त्यांच्यावर माहिती लपवल्याचाही आरोप आहे. तर नवाब मलिक यांच्या जावयाला ड्रग्ज प्रकरणी एनसीबीने अटक केली आहे.
राष्ट्रवादीची भूमिका काय?
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन पक्षाची अधिकृत भूमिका मांडली. आम्ही कोणीही याप्रकरणात हस्तक्षेप करणार नाही. धनंजय मुंडे यांनी याबाबत खुलासा केला आहे. तसंच नवाब मलिक यांच्या जावयाला झालेल्या अटकेबाबत फार माहिती नाही. दोन्ही विषय पोलिसांकडे आहेत, त्यांनी निपक्ष चौकशी करावी. जावयाने काय केलं, त्याचं खापर सासऱ्यावर का फोडता?' असा सवाल त्यांनी उपस्थित केला.