मुंबई 07 ऑक्टोंबर : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा जोर आता वाढत आहे. राजकीय वातावरण तापत आहे. अशा वातावरणात राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी सरकावर गंभीर आरोप केलेय. राज्य सरकार हे विरोधकांची हेरगिरी करत आहे असा आरोप शरद पवार यांनी केला. विरोधकांची मुस्कटदाबी करणं, त्यांना नामोहरम करण्यासाठी साम-दाम-दंड या धोरणाचा वापर सरकार करत असून हे अतिशय अयोग्य आहे. महाराष्ट्राचं राजकारण कधीच एवढ्या खालच्या पातळीवर गेलं नव्हतं असं मतही त्यांनी व्यक्त केलं. शरद पवार म्हणाले, विरोधकांवर पाळत ठेवणं असो की त्यांचं फोन टॅपिंग, अशी प्रकरणं आता वाढत आहेत. समजा मी कुणाला फोन करून या निवडणुकीत आम्हाला मदत करा असं सांगितलं तर लगेच काही तासांमध्ये त्या व्यक्तिंकडे Income Taxचे लोक जावून या भानगडीत तुम्ही पडू नका असं त्यांना सांगत असतात. अशी काही उदाहरणं आढळून आली आहेत.
वाचा - ...तर महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप, PMC बँक घोटाळ्यात नेत्यांना घरांची भेट
फोन टॅपिंग केल्याशीवाय या गोष्टी समजू शकत नाही असंही ते म्हणाले. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे मत व्यक्त केलं. पवार पुढे म्हणाले, कुठलाही सहभाग नसताना EDची नोटीस मला मिळाली त्यामुळे उलट जनजागृती झाली असंही त्यांनी सांगितलं. नरेंद्र मोदी, अमित शहा यांची राज्यात झंझावती प्रचाराची योजना असताना राहुल गांधी कुठे आहेत असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता त्यावर उत्तर देताना ते म्हणाले, लोकसभेच्या पराभवानंतर नेतृत्वानं गायब होणं योग्य नाही.
जय, पराभव हे होतच असतात. त्या काळात त्यांनी नेतृत्व सोडणं योग्य नव्हतं. त्यामुळे पक्षाचे कार्यकर्ते नाउमेद होतात. उलट त्या काळात त्यांना धीर द्यायला पाहिजे. त्यांना पक्षाचं नेतृत्व सोडायचचं असलं तरी ती योग्य वेळ नव्हती असं मतही त्यांनी व्यक्त केलं. राहुल गांधी आणि त्यांच्या सोबतच्या नेत्यांनी अधिक कष्ट करण्याची गरज आहे असं मतही त्यांनी व्यक्त केलं. महाराष्ट्राच्या प्रचारात राहुल गांधीही सहभागी होतील असंही ते म्हणाले. पक्षातून जे सोडून गेले त्यामुळे फारसा फरक पडणार नाही नवं नेतृत्व तयार होईल असं मतही शरद पवार यांनी या मुलाखतीत व्यक्त केलं.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा